कोरोनाचा संसर्ग मुंबईत रोज हजारेंच्या संख्येने वाढत असताना बहुतांश लोकप्रतिनिधीही होम क्वारंटाईन झाले आहेत. स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कार करण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला कोणी वाली नाही तर सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करण्यात मश्गूल आहेत.
मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना बघायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची असलेली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप रोजच कोणत्या ना कोणत्या प्रश्नांवरून एकमेकांच्या विरोधात चिखलफेक करताना दिसत आहेत. कोरोनाच्या काळात तरी राजकारण बाजूला ठेवून सर्वच सत्ताधारी आणि विरोधक जनतेच्या हिताची भूमिका घेतील, अशी आशा होती.
एकीकडे तीन महिने लॉकडाऊन असल्याने जनतेचे चांगलेच हाल झाले. अनेकांवर नोकरी गेल्याने उपासमारीची पाळी आली. त्यातच कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग झाल्याने अनेकांना आपल्या घरातील कुटुंबप्रमुखांना गमवावे लागले. आजही पालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्य माणसाला कोणी वाली नाही. एकीकडे मुख्यमंत्री लाखोंच्या संख्येत रुग्णांची व्यवस्था केल्याचे सांगतात. मात्र, वास्तव वेगळेच आहे. मुख्यमंत्र्यांनी अद्याप एकाही रुग्णालयाला भेट दिलेली नाही. केवळ गोरेगाव येथे उभारण्यात आलेले क्वारंटाईन सेंटर, ते पण लोकांना तेथे आणण्यापूर्वी तेथे भेट दिली. मात्र, गेल्या महिनाभरात मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही रुग्णालयाला भेट दिलेली नाही. या उलट कोकणातील चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते त्वरित अलिबागला गेले. मुख्यमंत्री घरातच बसून फेसबुक लाईव्ह करतात. बाहेर पडत नाहीत, व्हीडिओ कॉन्फरन्सिंग करतात. मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या रुग्णालयांना भेटी देणे आवश्यक होते. कारण महापालिका रुग्णालयातील वास्तव फार भयानक आहे. याउलट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे मात्र राज्यभर दौरा करत असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी आरोप केला की मग तो पालघर येथील साधुंच्या हत्येचा आरोप असो किंवा वांद्रे येथे जमलेली गर्दी असो लगेच सरकारमध्ये सहभागी असलेले शरद पवार हे दुसऱया दिवशी लाईव्ह करताना सरकारची बाजू लावून धरत असत. मात्र गेल्या काही दिवसात पवार यांनी देखील लाईव्ह केलेले नाही. त्यातच भाजपचे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर हे सरकारच्या विरोधात म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या विरोधात आक्रमक झाल्याचे बघायला मिळते. कोकणातील आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे हे देखील मुंबईतील रुग्णालयांमधील वास्तव फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत आहेत.
शिवसेना आणि भाजपातील राजकारणात राजभवन हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. दिवसाआड शिवसेना आणि भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेत आहेत. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर राज्यपालांनी या निर्णयावर आक्षेप घेताना विद्यापीठ कायद्यानुसार निर्णय व्हायला पाहिजे, अंतिम वर्षाची परीक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली. या परीक्षांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून विद्यार्थ्यांवर टांगती तलवार कायम आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात मात्र विद्यार्थी तसेच गोरगरीब लोकांचे नुकसान होत आहे. कोरोनाचा मुकाबला करताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकत्र दिसलेच नाहीत. फक्त सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे विरोधी पक्षनेते दिसले. मात्र, त्यानंतर हे चित्र दिसले नाही. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणि राज्यातही शिवसेना सत्तेत आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेना सत्तेत असल्याने भाजपकडून सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेलाच लक्ष्य केले जात आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत भाजपचे आमदार शेलार यांनी आक्रमक होताना युवा सेना नेते या परीक्षांबाबत कसे काय बोलू शकतात, असा थेट हल्ला करीत जोरदार टीका केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तर शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रविवारी जोगेश्वरी येथील ट्रामा केअर सेंटरच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. केवळ ऑक्सिजन खंडित झाल्याने किंवा ऑक्सिजनची यंत्रणा व्यवस्थित नसल्याने जर 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असेल, तर हे फार भयानक आहे. केवळ फेसबुक किंवा सोशल मीडियातून लाईव्ह करण्यापेक्षा
हॉस्पिटल तसेच इतर यंत्रणांना लाईव्ह भेटी देणे गरजेचे आहे. एकीकडे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे पीपीई किट घालून थेट कोरोनाच्या
वॉर्डमध्ये जाऊन रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱयांचे मनोबल वाढवताना दिसतात. आज कोरोनाचा संसर्ग मुंबईत रोज हजारेंच्या संख्येने वाढत असताना मुंबईतील बहुतांश लोकप्रतिनिधीही होम क्वारंटाईन झाल्याचे बघायला मिळत आहे. मुंबईत सर्वात स्वस्त या घडीला, तरी जीव असून स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कार करण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला कोणी वाली नाही आणि तिकडे सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करण्यात मश्गूल आहेत.
आता मुंबईत पावसाने हजेरी लावली असून कोरोनामुळे नालेसफाई म्हणावी तशी झालेली नाही. त्यातच एकीकडे कोरोनाचा कहर असताना दुसरीकडे साथीच्या आजाराने मुंबईत थैमान घातले, तर ही परिस्थिती हाताळण्यासाठी पालिकेने पुरेशी उपाययोजना केली पाहिजे. गेल्या वर्षी दीड वर्षाचा मुलगा मालाड येथे गटारात पडून वाहून गेला आणि त्याचा शोधही लागत नाही, यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असू शकेल. कोरोनाचा आजार हा बाहेरच्या देशात गेलेल्या भारतीयांनी आणला. मात्र, त्यांना या आजाराची म्हणावी तशी झळ बसली नाही. त्यात होरपळले ते सर्वसामान्य आणि हातावर पोट भरणारे मजूर. आता पावसाळ्य़ात तरी किमान साथीच्या रोगांचा प्रसार होणार नाही आणि मुंबईत पाणी तुंबणार नाही, यासाठी पालिकेने त्वरित उपाययोजना केली पाहिजे. तसेच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील आता काही बाबतीत लोकांचा विचार करून पालिकेत सत्तेत असणाऱया शिवसेनेला सहकार्य केले पाहिजे, अन्यथा, मुंबईकरांचे हाल होतील, हे मात्र नक्की.
प्रवीण काळे