प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामुळे सगळयांचेच हाल सुरु आहेत. त्यामध्ये ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचे तर जगणे मुश्किल झाले आहे. सातारा शहरातील फेरीवाल्यांना अनुदान देण्याची घोषणा सत्ताधाऱयांनी जाहीरपणे केली खरी परंतु अद्यापही कोणत्याही फेरीवाल्याला हे अनुदान देऊ केलेले नाही. ही बाब अतिशय शर्मनाक असून फेरीवाल्याच्या दुखावर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहात. आपण दहा दिवसात हे अनुदान न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा नगरसेवक अविनाश कदम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली दीड वर्षापासून कोरोना महामारीचे सावट सर्वत्र आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱयांचे जीवनमान अतिशय गंभीर झालेले आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार व नियम 247 मध्ये नमुद दुर्धर रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे ज्यांची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली आहे. नुकसान झाले असेल त्या व्यक्तीस पालिकेने मान्यता दिली असेल तर भरपाई देता येईल अशी तरतूद असताना सुद्धा सहा महिन्यापूर्वी सत्ताधाऱयांनी फेरीवाल्यांसाठी 1500 रुपये अुनदान जाहीर केले. परंतु अद्याप कुठल्याही फेरीवाल्यांना अनुदान दिले गेले नसल्याचे दिसून आले. ही बाब अतिशय शर्मनाक असून फेरीवाल्याच्या दुखावर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहात. आपण दहा दिवसात हे अनुदान न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, तसेच अशाच पद्धतीचे अनुदान रिक्षावाले, बांधकाम मजूर व हमाल, धुणेभांडी करणाऱयां महिला व यांना सुद्धा देण्याचा विचार नगरपालिकेने करावा या संदर्भात कागदपत्रांची पुर्तता करुन त्यांना सुद्धा अनुदान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.