मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईला आज सकाळपासुन पावसाने चांगलेच झोडपले आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांचा गोंधळ उडाला आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. तसेच रेल्वे स्थानकावर देखील पाणी भरले आहे. पहिल्याच पावसात मुंबई तुंब झाल्याचेच चित्र सगळीकडे दिसत आहे. तुंबलेल्या मुंबईच्या स्थितीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीटरवरून सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय. नालेसफाई कधी 107%..कधी 104%… दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”, पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे!, मुंबईकर हो!, सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा ..नेमेची येतो पावसाळा…पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा!!
तर दुसऱ्या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात. पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात…आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात! आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा!
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. दुर्देवाने मुंबईकरांचा जीव टांगणीला पडला आहे. 104 टक्के ते 107 टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरला. प्रशासनानं लक्ष न दिल्यानं कंत्राटदारानं पळ काढला. सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदारांनी केलेल्या कृत्यावर पांघरुण घातलं. संपूर्ण मुंबईमध्ये दरवर्षाला जवळजवळ 70 ते 100 कोटी रुपये केवळ नालेसफाईसाठी दिले जातात. मग पाच वर्षात 500कोटी रुपये आणि ते सोडून छोटे नाले असो, स्ट्रोम वॉटर ड्रेन असो, त्याची दुरूस्ती असो व पाणी तुंबू नये म्हणून केलेली अन्य कामे असो यासाठीचे दरवर्षाला 100 कोटीप्रमाणे 5 वर्षाचे अधिकचे 500कोटी. याचा अर्थ संपूर्णपणे पाच वर्षात एक हजार कोटींचा खर्च. पण मुंबईकरांच्या नशिबी केवळ तुंबलेलं पाणी घरात घुसण्याची स्थिती आहे. आजही स्ट्रोम वॉटर प्लांटमध्ये डेब्रिजच्या गोण्या पडल्यात. दुसऱ्याबाजूला मलईच्या गोण्या कंत्राटदाराकडे हे विदारक चित्र मुंबईकरांसमोर आलं आहे, असं आशिष शेलार यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.