सप, भाजप शासकाळात जनता राहिली दुःखी
वाराणसीत मायावतींचा विरोधकांवर टीका
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी गुरुवारी उत्तरप्रदेशच्या वाराणसी येथे जाहीरसभेला संबोधित केले. काँग्रेसनंतर समाजवादी पक्ष आणि भाजपच्या शासनकाळातही उत्तरप्रदेशची जनता दुःखी राहिली आहे. बसप यंदा स्वबळावर सर्व जागांवर निवडणूक लढत आहे. बसप पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करण्यासाठी या निवडणुकीत उतरला असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. मायावती यांनी स्वतःच्या सभेच्या प्रारंभी काँग्रेसवर निशाणा साधला. बसपचे संस्थापक काशीराम यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने एक दिवसाचाही राष्ट्रीय शोक जाहीर केला नव्हता. काँग्रेस पक्ष सत्तेवर असल्यास तो दलित, महिलांच्या कल्याणाकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.समाजवादी पक्षाच्या शासनकाळात उत्तरप्रदेशात गुंड, माफियांचे राज्य झाले होते. यामुळे उत्तरप्रदेशात नेहमीच तणावाची स्थिती राहिली आणि विकासाची कामे एक विशिष्ट भागापुरती मर्यादित झाली होती असा आरोप त्यांनी केला आहे.
धोरण, वृत्ती, निष्ठेनुसार काम करतो भाजप
जौनपूरमध्ये पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
भाजपचे स्टार प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्या तसेच अंतिम टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रचारसभा घेतल्या आहेत. जौनपूर येथील सभेत बोलताना मोदींनी भाजप तसेच अन्य पक्षांच्या कार्यपद्धतीतील फरक नमूद केला आहे. भाजप दीर्घकाळापासूनच धोरण, वृत्ती अन् निष्ठेवर काम करणारा पक्ष आहे. भाजपने सर्वांना सोबत घेत सर्वांचा विकास केला आहे. सबका साथ, सबका, विकास, सबका विश्वास ही भाजपची वृत्ती आहे. तर प्रत्येक लाभार्थीपर्यंत मध्यस्थाशिवाय योजना पोहोचविणे हे भाजपचे धोरण आहे. भाजपचे प्रत्येक काम निष्ठापूर्वक असते. आम्ही कुठल्याही भेदभावाशिवाय योजना सर्वांपर्यंत पोहोचवितो आणि हीच आमची निष्ठा असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत. माफियावाद्यांची वृत्ती जौनपूरचे लोक चांगल्याप्रकारे जाणतात. येथील एका गावात दलित कुटुंबांची घरे पेटविण्याचा आरोप असलेल्या लोकांवर माफियावाद्यांचा वरदहस्त आहे. याचमुळे दलित, गरीब, मागास आणि आमच्या बहिणींनी अशा लोकांपासून सतर्क रहायला हवे. सरकार चालविण्याची या माफियावाद्यांची उत्तरप्रदेशला लुटा, गरीबांची स्वप्ने चिरडून टाका अशीच पद्धत राहिल आहे. माफियावाद्यांना कधीच जनतेचे दुःख, वेदना, अडचणी दिसून आल्या नाहीत. कोरोनाच्या अवघड काळात परिवारवादी लोक कुठे होते, त्यांनी काय केले, हे उत्तरप्रदेशची जनता कधीच विसरू शकत नसल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पंजाबमध्ये पुन्हा घ्यावी लागणार निवडणूक!
बलबीर राजेवाल यांची लुधियानामध्ये पत्रकार परिषद
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी संयुक्त समाज पक्षाचे नेते आणि शेतकरी संघटनेचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी लुधियानामध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. संयुक्त समाज पक्षाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये आढावा बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. तर बीबीएमबीच्या (भाकरा-ब्यास मॅनेजमेंट बोर्ड) मुद्दय़ावरून 7 रोजी शेतकरी उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर जमा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंजाबमधील राजकीय चित्र पाहता कुठल्याच पक्षाचे सरकार सत्तेवर येण्याची चिन्हे नाहीत. परंतु संयुक्त समाज मोर्चा इतिहास रचणार आहे. पक्षाला मतांची अत्यंत मोठी हिस्सेदारी प्राप्त होणार आहे. युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या जबाबदारीपासून सरकार पळ काढत आहेत. सरकारने या विद्यार्थ्यांना त्वरित मायदेशी आणणे गरजेचे आहे. नाईलाज म्हणून हे विद्यार्थी विदेशात शिकायला गेले आहेत. येथील सरकारांनी आजपर्यंत या विद्यार्थ्यांसाठी काहीच केले नसल्याचा आरोप राजेवाल यांनी केला आहे.
संयुक्त समाज मोर्चा यंदा मतांचा विक्रम मोडणार आहे. आतापर्यंत कुठल्याच पक्षाला पूर्ण विजय मिळण्याची चिन्हे नाहीत. हैराण करणारा निकाल सर्वांसमोर येणार असल्याचे म्हणत राजेवाल यांनी निकालानंतर कुणासोबत आघाडी करणार या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला आहे.
फाजिलनगरमध्ये आव्हानात्मक स्थिती : स्वामीप्रसाद
भाजपकडून दिग्गज नेत्याची राजकीय कोंडी
भाजपला रामराम ठोकत समाजवादी पक्षात सामील झालेले आणि फाजिलनगर मतदारसंघातील सप उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य यांचे महत्त्वाचे विधान समोर आले आहे. स्वामीप्रसाद मौर्य यांनी मतदारसंघात अत्यंत मोठे आव्हान असल्याचे मान्य केले आहे. आपण दोनवेळा पराभूत झालेल्या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. आपण अवघड कामच निवडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात भाजपला मोठा फटका बसणार असून समाजवादी पक्षाला प्रचंड बहुमत मिळणार आहे. समाजवादी प्रचंड बहुमतासह निवडणुकीत वाटचाल करत आहे. पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने समाजवादी पक्षाचे वादळ सरकले असून पाचव्या टप्प्याप्रमाणेच 6 व्या टप्प्यातील मतदानातही सायकलच्या बाजूने लाट असल्याचे स्वामीप्रसाद यांनी नमूद केले आहे.
स्वामीप्रसादांच्या मुलाविरोधात गुन्हा
कुशीनगरच्या फाजिलनगर मतदारसंघात सप उमेदवार स्वामीप्रसाद यांचा मुलगा अशोक मौर्य याच्याविरोधात बुधवारी रात्री उशिरा आदर्श आचार संहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी अशोक मौर्यला नोटीस बजावून जिल्हय़ाच्या सीमेबाहेर पाठविले आहे. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत कुशीनगर जिल्ह्य़ाच्या सीमेत प्रवेश न करण्याची ताकीद अशोक मौर्यला पोलिसांकडून देण्यात आली आहे.
जिल्हय़ाचे रहिवासी नसतानाही अशोक मौर्य हे फाजिलनगर मतदारसंघात वाहनांसह फिरत होते तसेच मतदारांना पैसे वाटत होते असा आरोप आहे. आचार संहितेनुसार मतदानाच्या 48 तासांपूर्वी पासून मतदारसंघात जिल्हय़ाबाहेरील व्यक्तीला थांबता येत नाही. तरीही अशोक हे काही सहकारी आणि समर्थकांसह मतदारसंघात फिरत होते.
भाजप उमेदवाराची सप समर्थकांसोबत बाचाबाची
बलिया येथील महिला उमेदवाराचा व्हिडिओ व्हायरल
उत्तरप्रदेशात 6 व्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पडत असताना बलियाच्या बांसडीह येथील भाजप उमेदवार केतकी सिंह यांचा व्हिडिओ समोर आला असून यात त्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकावत ‘10 वेळा चप्पलेने मारेन, पण मोजणार एकच’ असे म्हणत असल्याचे दिसून येते.
बांसडीह मतदारसंघातील एका मंदिरानजीक भाजप उमेदवार केतकी सिंह यांच्या उपस्थितीत भाजप आणि सप समर्थकांदरम्यान जोरदार झटापट झाली. यादरम्यान केतकी सिंह यांनी एकटी असल्याचे समजू नका, चप्पलेने मारीन असे सप समर्थकांना उद्देशून म्हटले होते.
त्यानंतर भाजप उमेदवार आणि सप कार्यकर्त्यांदरम्यान झटापट सुरू झाली. तर केतकी सिंह यांनी एका सप कार्यकर्त्याची कॉलर पकडल्यावर त्याच्या सहकाऱयांनी गदारोळ सुरू केला आणि तेथे मारहाणीचा प्रकार घडला. बांसडीह हा बलियातील अत्यंत लक्षवेधी मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे मातब्बरनेते राम गोविंद चौधरी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने केतकी सिंह यांना उमेदवारी दिली आहे. 2017 मध्ये केतकी सिंह यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती आणि केवळ 1,687 मतांनी चौधरी यांच्याकडून त्या पराभूत झाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत दिसून येत आहे.
वाराणसीच्या 8 मतदारसंघांमध्ये भाजपकडून जोरदार प्रचार
पंतप्रधानांच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय :अमित शाह ठेवून आहेत नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीत त्यांची राजकीय प्रतिष्ठा कायम ठेवण्यासह राज्य आणि देशात एक मोठा संदेश देण्यासाठी भाजपने स्वतःची पूर्ण शक्ती झोकून दिली आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही वाराणसीमधील 8 ही मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. याकरता स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धुरा हाती घेतली असून प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा राजकीय घडामोडींवर ते स्वतः नजर ठेवून आहेत. तसेच पक्षाचे सर्व स्टार प्रचारक घरोघरी प्रचारापासून चौक सभा देखील करत आहेत.
घरोघरी जाण्याचा निर्देश
गुरुवारपासून मतदानाच्या दिवसापर्यंत कार्यकर्त्यांना घरोघरी जात प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. वाराणसीत 4 मार्च रोजी होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आणि 5 मार्च रोजी त्यांच्या जाहीर सभेची छायाचित्रे-व्हिडिओंना सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्ते लोकांपयंत पोहोचविणार आहेत. 5 मार्च रोजी प्रचार शमल्यावर सोशल मीडियाच्या मदतीने कार्यकर्ते मतदारांच्या सातत्याने संपर्कात राहणार आहेत.
7 मार्च रोजी सकाळपासून मतदान संपेपर्यंत भाजप कार्यकर्ते सतर्क राहणार आहेत. स्वतःच्या क्षेत्रातील प्रत्येक मतदार बुथपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदारीवर देखरेख ठेवण्यासह स्वतः देखील सक्रीय राहून मतदान संपेपर्यंत त्यांच्या संपर्कात राहण्यास पदाधिकाऱयांना सांगण्यात आले आहे.
रोड शोद्वारे 9 जिल्हय़ांमध्ये संदेश जाणार
भाजप नेत्यांनुसार 4 मार्च रोजी वाराणसी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोमधून 7 व्या टप्प्यातील मतदान असलेल्या 9 जिल्हय़ांमध्ये एक मोठा संदेश दिला जाणार आहे. याकरता रोड शोदरम्यान पूर्ण मार्गात गुलाबाच्या पाकळय़ांनी पंतप्रधानांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. पक्ष स्तरावर तयारी पूर्ण झाली आहे. तसेही पंतप्रधान काशीत आल्यावर काशीवासीय त्यांच्या स्वागतासाठी आतुर असतात. यंदाही पंतप्रधानांचे रोड शो भव्य होईल आणि त्याचा एक मोठा संदेश जनतेदरम्यान जाणार असल्याचे काशी क्षेत्राचे भाजप अध्यक्ष महेश चंद श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.