भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडुन समाचार
वार्ताहर / कराड
105 आमदार निवडून येऊनही सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही, हेच खरे भाजपचे दुखणे आहे. त्यामुळेच भाजपचे नेते सारखे कंडय़ा पेटवण्याचे काम करीत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. आमदार व कार्यकर्त्यांत चलबिचल होऊ नये, यासाठी भाजपचे नेते वारंवार महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे बोलत आहेत. मात्र राष्ट्रीय नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असल्याचे सांगत अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.
बुधवारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री कराडला समाधीस्थळी आले होते. खासदार श्रीनिवास पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले की, अतिवृष्टी, कोरोना, निसर्ग चक्रीवादळ अशा अनेक संकटातूनही महाविकास आघाडीचे सरकार पुढे वाटचाल करीत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने 10 कोटी रूपयांची मदत दिली आहे. तर एस. टी. कर्मचाऱयांसाठी 1 हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने धान्य उत्पादकांना केवळ 1800 रूपयांचा दर दिल्याने राज्य सरकारने त्यात सातशे रूपयांची वाढ करून धान्याला 2500 रूपयांचा हमीभाव देण्याचे काम केले आहे. लॉकडाऊन काळात राज्य व देशासह संपूर्ण जगाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अशावेळी केंद्र सरकारने राज्यात कोणाचे सरकार आहे, हे न पाहता भारत देश म्हणून नि:पक्षपणे मदत करणे गरजेचे आहे. मात्र असे होत नाही. केंद्र सरकारकडील जीएसटी कराचे 29 हजार कोटी रूपये राज्याला अद्याप दिलेले नाहीत.
वीज माफीच्या मुद्यावर अजित पवार म्हणाले की, राज्यात सर्व प्रकारची 59 हजार कोटींची वीज बिले थकीत असल्याने महावितरण कंपनी अडचणीत आली आहे. भाजप सरकारच्या काळात चुकीचे निर्णय घेण्यात आले. वास्तविक आघाडीच्या काळातील महावितरणची स्थिती व भाजपच्या काळातील थकबाकीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. भाजपच्या काळात महावितरणची थकबाकी वाढल्यानेच महावितरण अडचणीत आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.