दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ग्वाही : मुख्यमंत्र्यांविरोधात थेट लढतीसाठी ’आप’ला पाठिंबा देण्याचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या नेत्यांची आपला गरज असून त्याकामी पुती गावकर यांच्यासारख्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा. असे नेते मिळाल्यास आपचे बळ वाढणार असून राज्यात आप सत्तेत आल्यास गावकर यांच्याच मार्गदर्शनाखाली सहा महिन्यांत खाणकाम पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. गोव्यात एकदाच ‘आप’ला संधी मिळाल्यास गोमंतकीय भाजप आणि काँग्रेसला कायमचे विसरतील, असा दावाही केजरीवाल यांनी केला.
गोवा मायनिंग पीपल्स प्रंटचे अध्यक्ष तथा खाण अवलंबितांचे नेते पुती गावकर यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर श्री. केजरीवाल पत्रकारांशी बोलत होते. राज्यात खाणी पुन्हा सुरू करणे तसेच जमीन मालकीचे सर्व प्रश्न सोडवणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
गोव्याच्या राजकारणात भ्रष्टाचार ही मुख्य समस्या
गोव्याच्या राजकारणात भ्रष्टाचार ही मुख्य समस्या बनली आहे. तर आम आदमी हा देशातील सर्वात प्रामाणिक पक्ष आहे. आप सरकार दिल्लीत 24 तास मोफत वीज, पाणी देत आहे. दर्जेदार आरोग्यसुविधा, दर्जेदार रस्ते, असा पायाभूत विकास झालेला आहे. गोव्यातील असंख्य लोक दिल्लीत जात असतात. त्या सर्वांनी हा विकास पाहिला आहे, आमच्या कामगिरीचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे तसाच विकास गोव्यातही व्हावा, अशीच गोमंतकीयांची इच्छा आहे, असे केजरीवाल पुढे म्हणाले.
भंडारी समाज आपकडे आकर्षित
राज्यातील सर्वात मोठा असलेला भंडारी समाजसुद्धा आज आपकडे आकर्षित होत आहे. त्याशिवाय अन्य समाजातील लोकही आपमध्ये प्रवेश करत आहेत. यामागे एकमेव कारण म्हणजे आजच्या घडीला आप पक्ष हाच देशातील सर्वात प्रामाणिक पक्ष आहे. अशा प्रामाणिक पक्षाचे सरकार राज्यात असेल तर सर्व कामे होत राहतील, असे केजरीवाल म्हणाले.
चारित्र्यवान, प्रामाणिक नेत्यांनाच उमेदवारी
आम्ही केवळ चारित्र्यवान, प्रामाणिक, चांगला लोकसंपर्क, जिंकण्याची क्षमता असलेल्या नेत्यांनाच उमेदवारी देणार आहोत. अशावेळी भंडारी समाजातील लोकांना उमेदवारी मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. अशाच प्रकारे दिल्लीतही आम्ही प्रामाणिक नेत्यांचे सरकार दिले आहे. त्यामुळेच लोकांनी आम्हाला दोनवेळा सत्ता दिली आहे.
मुख्यमंत्री-गावकर यांच्यात थेट लढतीसाठी पाठिंबा द्यावा
पुती गावकर यांनी सांखळीतून लढण्याची तयारी दर्शविल्यास आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू. तसेच मुख्यमंत्री आणि गावकर यांच्यात थेट लढत व्हावी यासाठी अन्य सर्व पक्षांनीही सांखळीतील आपले उमेदवार मागे घेऊन गावकर यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन देखील केजरीवाल यांनी केले.
दरम्यान, राज्यातील खास करून उत्तर गोव्यातील विविध खाण परिसरांना आज भेटी देऊन तेथील खाण अवलंबित लोकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत, असेही केजरीवाल यांनी सांगितले.
खाणी सुरू करणे भाजपला अशक्य : गावकर
श्री. गावकर यांनी बोलताना, 2012 पासून राज्यात तांत्रिकदृष्टय़ा खाणकाम थांबले असून त्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जबाबदार असल्याचे सांगितले. राज्यात आणि केंद्रातही स्वतःचे सरकार असतानाही गत 10 वर्षांत भाजपला खाणी सुरू करणे शक्मय झाले नाही, आणि भविष्यातही त्यांना ते जमेल की नाही याबद्दल शंका आहे. याऊलट ‘आप’च्या कायदेतज्ञांनी खाणी पुन्हा कशा सुरू करता येतील याचा अभ्यास सुरू केला आहे, असे गावकर पुढे म्हणाले. आप हा आश्वासने पूर्ण करणारा पक्ष आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत पायाभूत सुविधा, मोफत वीज आदी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या दिल्ली मॉडेलने प्रेरित होऊनच आपण आपमध्ये प्रवेश केला, असे गावकर यांनी पुढे सांगितले.