महानगरपालिकेवरील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मतदार सज्ज : आज सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगव
सीमाभागातील मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या बेळगाव महापालिकेची निवडणूक शुक्रवार दि. 3 रोजी होत आहे. महापालिकेवर मराठी भाषिकांना सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रीय पक्ष आणि कर्नाटक सरकारचा खटाटोप सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असून मराठी भाषिक नव्या उमेदीने आणि नवचैतन्याने निवडणूक रिंगणात उतरले असल्याने मराठी भाषिकांचा विजय निश्चित आहे.
आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत महापालिकेवर मराठी भाषिकांच्या विजयाची नांदी ठरली आहे. यामुळे महापालिकेवर या निवडणुकीत चाळीसहून अधिक जागा अपेक्षित आहे. चाळीस जागा मिळविण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून मराठी भाषिकांना हमखास यश मिळेल असा विश्वास मराठी भाषिक मतदार व्यक्त करीत आहेत. महापालिकेच्या 58 जागांसाठी निवडणूक होत आहे. शुक्रवारी सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ होणार असून निवडणूक यंत्रणेने सर्व तयारी केली आहे.
निवडणूक रिंगणात 385 उमेदवार
निवडणुकीच्या रिंगणात 385 उमेदवार आहेत. मात्र मराठी भाषिक मतदार असलेल्या वॉर्डांमध्ये गल्लीच्या पंच मंडळीच्या प्रयत्नाने एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला असल्याने असंख्य उमेदवारांनी मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी माघार घेतली आहे. मात्र यंदा प्रथमच महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. यामुळे काही मोजक्मया वॉर्डांत दुरंगी आणि सरळ लढती होत आहेत. परिणामी या लढती प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. तसेच राष्ट्रीय पक्षांनी युती करून मराठी भाषिकांचा पराभव करण्याचा कट रचला आहे. याची जाणीव ठेऊन मराठी भाषिक मतदारांनी आपले बहुमोल मत मराठी भाषिक उमेदवारांच्या पारडय़ात घालण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
महापालिकेवर मराठीची पताका फडकाविण्यासाठी सज्ज झालेल्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना खडय़ासारखे वेचून टाकण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला आहे.
वॉर्ड पुनर्रचनेत राजकारण
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही अनिश्चितेचे सावट होते. मराठी भाषिकांना रोखण्यासाठी वॉर्ड पुनर्रचनेत राजकारण करण्यात आले
असून संपूर्ण वॉर्डांची रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. तसेच वॉर्ड आरक्षणातदेखील खेळी करण्यात आली असून मराठी भाषिकांचे वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. पण म. ए. समितीची एक-एक महिला रणरागिणी असून यापूर्वी अनेक महिलांनी महापालिका सभागृहात आपले कर्तृत्व गाजविले आहे. त्यामुळे महिला असो वा पुरूष आम्ही महापालिकेवरील सत्ता कायम ठेवणार असा चंग उमेदवारांनी बांधला आहे. वॉर्ड पुनर्रचनेच्या गोंधळामुळे निवडणूक न्यायालयीन कचटय़ात सापडली होती. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र राज्य शासनाला निवडणुका टाळण्यात अपयश आले आहे.
सदर निवडणुका 2021 च्या जनगणतीनुसार घेणे गरजेचे होते. मात्र जनगणती झाली नसल्याने आरक्षणाचा घोळ निर्माण झाला होता. यामुळे 2011 च्या जनगणतीच्या आधारे वॉर्ड पुनर्रचना करून त्यानुसार आरक्षण जाहीर करून निवडणुका घेण्यात येत आहेत. यामुळे पन्नासहून अधिक माजी नगरसेवक आपले नशिब आजमाविण्यासाठी रिंगणात पुन्हा उतरले आहेत. तसेच निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार असून भावी नगरसेवकांचे भवितव्य पेटीबंद होणार आहे. सोमवार दि. 6 रोजी होणाऱया मतमोजणीनंतर महापालिकेला लोकनियुक्त नगरसेवक लाभणार आहेत.
बोगस मतदान
शहरातील मतदार यादीचा घोळ मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही सुरू होता. मतदारयादीत स्थानिक नागरिकांची नांवे नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्याने नांव नोंदणी केलेल्या मतदारांची नांवे यादीत सामिल झाली आहेत. पण नांव नसल्याचे गृहीत धरून मतदानाचा हक्क बजावला नसल्यास याचा गैरफायदा घेऊन बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. यामुळे असे प्रकार आढळून आल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱयाकडे तक्रार करावी.