तृणमूलच्या नेत्या सैयोनी घोष यांचे आश्वासन, ‘आप’च्या तीन नेत्यांचा पक्षात प्रवेश
प्रतिनिधी /सांगे
तृणमूल काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर 250 दिवसांत पर्यावरणीय समतोल राखून गोव्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय सुरू केला जाईल, असे आश्वासन तृणमूल काँग्रेसच्या युवा विभाग अध्यक्षा सैयोनी घोष यांनी सांगे येथे पत्रकार परिषदेत दिले. यावेळी आम आदमी पक्षाच्या गोवा प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा गौरिशा गावकर, आपचे सांगे मतदारसंघाचे माजी अध्यक्ष आनंद नाईक, आपचे नेते रियाझ शेख यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. घोष यांनी त्यांना रीतसर प्रवेश दिला.
त्यांच्या प्रवेशाने सांगे मतदारसंघात तृणमूल काँग्रेसची ताकद वाढली असून गोव्यात तृणमूल काँग्रेस आपले संघटन वाढविण्यासाठी आली आहे. भले विरोधक पर्यटक म्हणत असले, तरी त्यांची आम्हाला पर्वा नाही. गोव्यात विरोधकांना तृणमूलची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे ते बाहेरचे म्हणतात. आम्ही गोव्यात राजकीय लढाई लढण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही पर्यटनासाठी आलेलो नाही, असे घोष म्हणाल्या.
तृणमूलचे सरकार आल्यानंतर नोकऱयांमध्ये 80 टक्के राखीवता गोवेकरांना दिली जाईल. गोव्यातील जनतेने एक वेळ तृणमूलला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. रोजी-रोटी, मकानबरोबरच रस्ता, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधांची गरज असते. पंतप्रधान मोदी डिजिटल इंडियाच्या गोष्टी सांगतात. पण आज ग्रामीण भागांत मोबाईल नेटवर्क मिळत नाही ही शोकांतिका आहे. ममता बॅनर्जींचे व्हिजन पुढे नेण्यासाठी गोव्यात तृणमूल हा पर्याय असून मतदारांकडून पाठिंब्याची अपेक्षा आहे, असे घोष यांनी सांगितले.
आपच्या नेत्या गौरिशा गावकर, आनंद नाईक आणि रियाझ शेख यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नवीन शक्ती प्राप्त झालेली आहे. गौरिशा गावकर या तीन वेळा पंच म्हणून निवडणूक आल्या असून उपसरपंच म्हणूनही त्यांनी कामकाज पहिले आहे. पक्षात त्यांचे स्वागत आहे, असे तृणमूलच्या उमेदवार राखी प्रभुदेसाई नाईक यांनी सांगितले. तृणमूलबद्दल लोकांमध्ये विश्वास वाढलेला आहे. सांगे मतदारसंघात लोकांना बदल हवा आहे. आपण सर्वसामान्यांचे विषय घेतल्याने चांगला प्रतिसाद लाभत आहे. आपण संघर्षातून पुढे आलेली आहे. लोकांचे ज्वलंत प्रश्न, समस्या घेऊन संघर्ष करत इथपर्यंत आपण आले आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी तृणमूलचे सांगे गट अध्यक्ष जुझे आफान्सो व इतर कार्यकर्ते हजर होते. आपने माझी फार निराशा केली. केजरीवाल आणि राहुल म्हांब्रे यांनी भाजीवाले व रिक्षावाल्यांना तिकीट न देता पैसेवाल्यांना तिकिटे दिली असल्याचा आरोप गौरिशा गावकर यांनी केला. कुर्पे गावात धड साळावलीचे पाणी मिळत नाही. ममता बॅनर्जी या धडाडीच्या महिला असून त्यांचे कार्य आणि गोव्यासाठीचा विकासनामा पाहून आपण प्रभावित झाले. सांगेच्या विकासासाठी राखी नाईक यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.