पंतप्रधान मोदींचा काँग्रेस अन् सपवर मोठा शाब्दिक वार
परिवारवाद्यांनी ज्या जिल्हय़ांना विकासापासून वंचित ठेवले, अशा जिल्हय़ांच्या विकासासाठी आम्ही अधिक मेहनत करत आहोत. परिवारवाद्यांनी जे करायला हवे होते, ते देखील आम्ही करत आहोत. महाराजगंज याचे उदाहरण आहे. नेपाळ सीमेपर्यंत रस्त्यांचे जाळे निर्माण केले जातेय. महाराजगंजमध्येही रस्ते निर्माण होत आहेत. कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत असून यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. जगभरातून भाविक दाखल झाल्याने सर्वांना लाभ होणार असल्याचे मोदींनी प्रचारसभेला संबोधित करताना म्हटले आहे.
आम्ही केवळ आश्वासने दिली नाहीत, तर अर्थसंकल्पात तरतूद देखील केली आहे. वायब्रेंट व्हिलेज असे नाव योजनेला दिले असून याच्या निर्मितीत पंकज चौधरी यांचे मोठे योगदान आहे. त्यांना येथील भौगोलिक स्थितीची जाणीव आहे. महाराजगंला याचा लाभ मिळणार आहे. परिवारवादी सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचाराद्वारे अमाप संपत्ती कमावत असतात. परिवारासाठी नोटांचा ढिग लावतात. स्वतःच्या परिवारासाठी सर्व सुखसुविधा असाव्यात अशी त्यांची इच्छा असते, गरीबांच्या स्थितीची ते चिंता करत नसल्याची टीका मोदींनी सप अन् काँग्रेसला उद्देशून केली आहे.
उत्तम उपचाराची व्यवस्था
परिवारवादी उपचारासाठी विदेशात पोहोचतात, परंतु गरीबाला कर्ज घ्यावे लागते. याचमुळे भारत सरकारने 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला आहे. आम्ही गरीबांसाठी उत्तरप्रदेशच्या प्रत्येक जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करत आहोत. मध्यमवर्गातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे असा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. गरीब घरातील मुलांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करता यावे म्हणून मुद्रा योजनेद्वारे निधीसहाय्य करण्यात आल्याचे मोदींनी महाराजगंज येथील सभेत बोलताना म्हटले आहे.
जातीपातीत अडकविण्याचा डाव
पूर्वांचल कशाप्रकारे विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय हे पाहून परिवारवाद्यांना बोचत आहे. लोकांना जातीपातीत अडकवून हे परिवारवादी भारताचा विकास रोखू पाहत आहेत. या परिवारवाद्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे. हे परिवारवादी भारताला बलशाली होताना पाहू इच्छित नाहीत. भारताच्या आत्मविश्वासावर, आमच्या आत्मनिर्भरतेवर हल्ला करणाऱयांना उत्तरप्रदेश कधीच माफ करत नाही. आज पूर्ण भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना परिवारवाद्यांची झोप उडाली असल्याचे विधान मोदींनी केले आहे.
परिवारवादी लक्ष्य
परिवारवादी कधीच भारताला समर्थ करू शकत नाहीत. उत्तरप्रदेशाल सशक्त करू शकत नाहीत. शेतीपासून अंतराळापर्यंत भारताला मजबूत करण्याची गरज आहे. भारताला सामर्थ्याशाली करायचे आहे. यंदा लोकांचे मत समर्थ देश, सशक्त उत्तरप्रदेशसाठी असणार असल्याचे मोदी म्हणाले.