आंबेडकरनगरमध्ये अखिलेश यांची मोठी घोषणा
समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आंबेडकरनगर येथे पोहोचलेले पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी सहाव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी मोठी घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास पुढील 5 वर्षांपर्यंत मोफत धान्य देणार आहोत. याकरता आम्ही आतापासूनच तयारी केली आहे. निवडणुकीत भाजपच्या पराभवाच्या भीतीने बाबांची (योगी आदित्यनाथ) झोप उडाली आहे. जनतेने त्यांना बाय-बाय केले आहे. लोक भाजप सरकारमुळे त्रस्त असल्याचे अखिलेश यांनी सभेत बोलताना म्हटले आहे.
भाजपच्या नेत्यांचा उत्साह आता ओसरला आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असण्यासह सर्वात खोटारडा पक्ष आहे. भाजपपासून सावध राहण्याची गरज आहे. भाजप सरकारच्या काळात शेतकऱयांना खत मिळेनासे झाले आहे. खत्याच्या प्रत्येक पिशवीचे वजन 5 किलोंनी कमी करण्यात आले आणि किंमतही वाढविण्यात आली आहे. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास 10 किलोंची चोरी करतील. भाजप सरकारच्या काळात देशात कुठलाच विकास झालेला नाही, उलट विमान कंपनी आणि विमानतळ विकण्यात आल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.
मागील 3 वर्षांमध्ये मुलांच्या शिक्षणाचा बोजवारा उडाला, सरकारने शिक्षण पुन्हा रुळावर आणण्यासाठी काहीच केले नाही. शिक्षक होऊ पाहणाऱया उमेदवारांवर अन्याय करण्यात आला. शिक्षामित्रांचेही कल्याण केले गेले नाही. समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यास शिक्षामित्रांना मदत करण्यात येईल आणि जुनी पेन्शनव्यवस्था लागू करण्यात येणार आहे. बीएड आणि टीईटी उत्तीर्ण उमेदवारांना समायोजित केले जाईल. रोजगार सेवकांना कायमस्वरुपी नोकरी देण्यात येणार आहे. भाजपने विजेचे उत्पादन न वाढवता केवळ दर महाग केला असल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे.