आपण व्यवहारात नेहमी पाहतो की, फटकळ, स्पष्टवक्त्या किंवा कोणतीही गोष्ट तोंडावर खरी सांगणाऱया माणसांचा लोकांना राग येतो. त्यामुळे लोक त्यांच्यापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतात. पण म्हणतात ना स्वभावो दुरतिक्रम:। स्वभावाला औषध नाही. म्हणजे एखादे कडू औषध रुग्णाच्या गळी उतरवायचे असेल, तर डॉक्टर साखरेचे वेष्टन असलेली गोळी देऊन तो रोग बरा करतात. त्यामुळे रोग्याच्या जिभेला साखरेची गोड चव फक्त कळते, पण ती घशात गेल्यावर त्यातील कडू औषध आपले काम करू लागते आणि त्याचा योग्य परिणाम शरीरावर होतो, रोगी पूर्ण बरा होतो. म्हणूनच एखाद्याचा दोष, त्याची लबाडी, त्याचा खोटेपणा उघडकीस आणायचा असेल तर गोड बोलून ते समोर आणल्यास त्या माणसाला राग येत नाही आणि गोड बोलायला पैसेही पडत नाहीत. गोड बोलण्याने अनेक प्रश्न सोडवणे सोपे जाते. माणसेही तुटत नाहीत. अशी माणसे लोकांना प्रिय होतात. उलट कटू सत्य बोलण्याने ती अप्रिय होतात. उदा. विदुरासारखा धर्मज्ञ, राजनीतीज्ञ, सत्शील पुरुष कटू सत्य बोलण्याने अप्रिय ठरला. म्हणूनच एका श्लोकात सांगितले आहे. प्रियविक्मयप्रदानेन सर्वे तुष्यन्ति मानवा:। तस्मात् तदेव वक्तव्यं वचने किं दरिद्रता।। अर्थ- गोड बोलण्यामुळे सर्वच माणसे संतुष्ट होतात. म्हणून गोडच बोलावे. बोलण्यात दारिद्रय़ कशाला? यात बोलण्यात दारिद्रय़ नसावे, तर माधुर्य असावे असा अर्थ अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे अप्रिय सत्य बोलू नये. सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् असेही एक सुभाषित आहे. हे सांगणारी एक छोटीशी गोष्ट आहे. एका राजाकडे एक ज्योतिषी आला. राजाने त्याला आपले भविष्य विचारले. त्याने सांगितले, ‘तुमची सारी मुलेबाळे तुमच्या देखत मरणार’. हे ऐकून राजा रागावला. त्याने ज्योतिषाला हाकलून दिले. एकदा दुसरा एक ज्योतिषी आल्यावर राजाने त्यालाही आपले भविष्य विचारले. त्यानेही तेच भविष्य पण वेगळय़ा शब्दात सांगितले. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्हाला तुमच्या मुलाबाळांपेक्षा, सर्वांपेक्षा जास्त आयुष्य देवाने दिले आहे’ राजाने संतुष्ट होऊन त्या ज्योतिषाचा सन्मान केला. म्हणून गोड बोलावे. बोलण्यात दारिद्रय़ कशाला? राजकारणात या सुभाषितांचा वापर फार मोठय़ा प्रमाणात पहायला मिळतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही!
Previous Articleतूंतें नमितों श्रीभगवंता
Next Article कोकाकोला करणार 2220 कर्मचाऱ्यांची कपात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.