बलराम व श्रीकृष्णाच्या चरणापाशी डोके आपटून घेत शोकाकूल सत्यभामा म्हणाली -आपल्या सारखा पराक्रमी वीर पती आणि महाबलाढय़ दीर पाठीशी असताना माझ्या वडिलांना रात्री ते झोपलेले असता घरात शिरून मारण्यात आले. एखाद्या पशू प्रमाणे त्यांची शिकार करण्यात आली. याचा न्याय व्हायलाच हवा असे म्हणून तिने देवापाशी आपले गाऱहाणे मांडले.
तें ऐकोनि राममुरारि। अवगणी मनुष्यलोकानुसारी । दु:ख न कीजे जिहीं ईश्वरिं । ते दु:खलहरी अनुभविती । राया कुरुभूमंडलपाळा । रामकृष्णही तये वेळां । अश्रु आणूनि नेत्रकमळां । म्हणती जाला अन्याय । अहो खेदें म्हणती आम्हां। परम कष्टा न करवे सीमा । विलाप करूनि म्हणती अधमा । मणीचा प्रेमा पाणहर । आम्ही जीत असतो पृथ्वी । आमुच्या सुहृदा ऐसी पदवी । तेव्हां आमुची कीर्ति आघवी । वृथा मानावी कीं ना हो । ऐसें म्हणूनि शोकाभिभूत । कौरवांतें पुसोनि त्वरित । अधि÷tन द्वारकापंथ । जाते जाले तें ऐका ।
सत्यभामेच्या जीवीची व्यथा बलराम व कृष्णाने ऐकली. वास्तविक ईश्वराला कधी दु:खाचा अनुभव येतो काय? पण सत्यभामेचा विलाप ऐकून बलराम व कृष्णाला दु:ख झाले. डोळय़ात अश्रू आणून ते म्हणाले-सत्यभामे! तुझ्या पित्यावर नक्कीच अन्याय झाला आहे. आम्ही जिवंत असताना आमच्या सुहृदांनाच असे भयंकर दु:ख भोगावे लागावे ना? आमची कीर्ति मग वृथा मानावी लागेल, असे म्हणून शोकाकूल मनाने त्यांनी तातडीने कौरवांचा निरोप घेतला व ते द्वारकेकडे रवाना झाले.
क्लेशभरें न सरे वाट । सारथिघोडियां देऊनि साट। रथ चालतां घडघडाट । द्वारकाप्रविष्ट पैं जाले। प्रवेशोनि आत्मसदनीं । सर्व वृत्तांत ऐकिला श्रवणीं। शतधन्व्याची लधि÷करणी । अंतःकरणीं जाणितली। सत्यभाम संकर्षण । सहित सानुग पार्षदगण । द्वारका पावतां श्रीभगवान । भेटले स्वजन संतोषें । हस्तिनापुराहूनि हरि । ऐसे येऊनि द्वारकापुरिं । स्वजन भेटतां परस्परिं । गोष्टी निर्धारी कळू आली । सत्यभामेचे पुसोनि अश्रु । कृष्णें प्रतापें स्पर्शिले स्मश्रु। जेणें वधिला निरागस श्वश्रु । तो निर्धारें मारीन। सत्राजितची जैसी दशा । शतधन्व्यासी वधीन तैसा। मणिहर तस्कर वधितां दोषा । पात्र सहसा मी नोहें। निद्रितहंता आततायी । त्यातें वधितां दोष नाहीं । ऐसें बोलोनि शेषशायी । कान्ता स्वभवीं सान्तवी । शतधन्व्याचें करूनि हनन । त्यापासूनि स्यमंतकरत्न । हरीन तेव्हां सत्यप्रतिज्ञ । जाणती जन मजलागीं । ऐसी भगवन्मुखींची वाणी । शतधन्व्याचे पडतां श्रवणीं । धडकी भरली अंतःकरणीं । तत्कृत करणी अवधारा ।
शोकाकूल अवस्थ्येमुळे द्वारकेकडे जाणारा रस्ता संपतच नाही आहे असे मनाला वाटत होते. बलरामदादांनी सारथ्यांना सक्त ताकीद दिली व रथ वेगाने दौडवायला सांगितले. घडघडाट करत रथ एकदाचे द्वारकेत पोहोचले. सत्यभामा, बलराम, कृष्ण व त्यांचे पार्षद द्वारकेला पोहोचल्या बरोबर आप्तेष्टांची व त्यांची भेट झाली.