प्रतिनिधी / इचलकरंजी
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बरोबर रविवार सकाळपासून संवाद सुरु आहे. नृसिंहवाडी पर्यंत आंदोलक सत्याग्रहींना अडविण्यात येणार नसल्याचे शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे नृसिंहवाडी येथे स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून पुढील जलसमाधी आंदोलनाचा निर्णय जाहिर करण्यात येईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दुपारी हेरवाड ता. शिरोळ येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
माजी खा. शेट्टी म्हणाले, प्रयाग चिखली ता. करवीर येथून गेले पाच दिवस पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश जलसमाधी पदयात्रा सुरु झाली आहे. पण शासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. रविवारी सकाळपासून रस्त्यावर उतरलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची अधिक आहे. याची शासनाने दखल घेत शासन पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. पाच दिवसापासून मी संवादाची दारे उघडी ठेवली आहेत. हा सत्याचा सत्याग्रह असून सत्याचा विजय होणार असल्याची माहिती दिली.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, प्रत्येक वर्षी महापूराची झळ बसू नये. याकरीता केंद्र सरकार, राज्य सरकार, महामार्ग अधिकार, केंद्रीय जल आयोग यांनी पुढाकार घेवून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात येणाऱ्या महापुरावर कायमचा तोडगा काढण्यासाठी योग्य पावले उचली गेली पाहिजेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पूरग्रस्त लोकांना भरीव सानुग्रह अनुदान, व्यापारी, उद्योजक आदींना शासन मदतीची गरज आहे. ती विना विलंब करावी असे सांगितले.