अध्याय तेरावा
भगवंत म्हणाले, शिष्याच्या दृष्टीने गुरूचे भजन हेच सर्व साधनातील श्रे÷ साधन आहे. उद्धवा ! त्यानेच ब्रह्मसमाधान प्राप्त होते. जो गुरुचरणाचे भक्तिभावाने भजन करतो, तो सच्चिदानंदमंदिरात राहतो.
असे बोलून श्रीकृष्णांनी प्रेमाने चारही हात पसरले आणि त्या प्रेमळ हातांनी मोठय़ा आनंदाने उद्धवाला पोटाशी धरले.
देवाने सद्भक्ताला आलिंगन दिल्यामुळे हृदयाशी त्याचे हृदय मिळाले, तेव्हा अर्थातच सांगणे आणि विचारणे ही दोन्ही बंद पडली. चारीही वाणींना मौन पडले. जीव जीवपणाही विसरला. सद्भक्तीचा भावार्थ बाराव्या अध्यायात भगवंतांनी स्पष्टपणे सांगितला. तो असा की, भक्तांना त्यांच्या भक्तीने श्रीकृष्णनाथ नेहमी प्राप्त होतो. आत्मप्राप्ती होण्याला कारण केवळ भावार्थच आहे. भावार्थाशिवाय इतर साधने हे वृथा श्रम होत. जप, तप, यज्ञ किंवा दाने भावार्थासाठीच करावयाची असतात. तो भावार्थ ज्याने साध्य केला, त्याचा जन्म धन्य होय. नरदेहाची प्राप्ती धन्य आहे ! साधूंची संगती धन्य आहे ! आणि जे भगवद्भक्तीत रंगले, ते भावार्थी अत्यंत धन्य होत ! भगवन्मार्गात जे रंगून जातात त्यांचे चित्त विषयसुखाला विसरून जाते. हे कसे साध्य होते ती हंसगीताची कथा आता भगवंत उद्धवाला सांगतील. ते निरूपण अत्यंत रसभरित असून केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे, तेराव्या अध्यायामध्ये बुद्धी सात्वीक का हवी ते तपशीलवार सांगितले असून सद्विद्येच्या उद्भवाचा अनुक्रम अत्यंत सुलभ अशा रीतीने वर्णिला आहे. त्या हंसाचा इतिहास व त्यातच चित्ताला विषयांचा वियोग कसा होतो तेही सुलभ रीतीने सांगितले आहे. बाराव्या अध्यायाच्या शेवटी सद्गुरूची भक्ती करून विद्यारूपी कुठार प्राप्त करून घेऊन जीवातील वासनाच छेदून टाकावी असे सांगितले. जीवाचे जीवपणच छेदून टाकिले की, सर्वच साधने सोडून द्यावीत, हे उद्धवाने ऐकले पण त्यावर तो काहीच बोलला नाही. तेव्हा उद्धवाच्या मनातील हेतु, त्याच्या अंतःकरणांत चाललेला गूढ विचार, हे सर्व नीटपणे ओळखून देव श्रीकृष्ण आपण होऊनच बोलू लागले. ते म्हणाले की, त्रिगुणाचे सूत्र लागून जीवाला जीवपण आलेले असते. ते तीन गुण अंगांत आहेत तोपर्यंत सद्विद्या उत्पन्नच होणार नाही. नारळाच्या तोंडावरची खीळ काढली नाही तर नारळातील पाणी काही हातात यावयाचे नाही. त्याप्रमाणे गुणच जर खरोखर गेले नाहीत, तर विद्या कशी उत्पन्न होणार ही तुला वाटलेली अडचण माझ्या लक्षात आली आहे. आता हे त्रिगुण कसे बाजूला करायचे तेही सांगतो. सत्त्व, रज आणि तम हे तीन बुद्धीचे म्हणजे मायेचे गुण आहेत, आत्म्याचे नव्हेत, सत्त्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा नंतर शुद्धसत्त्वाने वृत्तिरूप सत्त्वगुणाचाही त्याग करावा. आता सच्चिदानंद म्हणून जो आहे, तो काही आत्म्याहून भिन्न नाही आणि आत्मस्वरूपामध्ये काही तीन प्रकारचे भेद नाहीत. ते केवळ सच्चिदानंदस्वरूपच असते. म्हणून गुणांची आणि आत्म्याची संगती कधी कल्पांतीसुद्धा घडत नाही. गुणानेच गुणांचा नाश करून सद्विद्या संपादन करावी. ज्यावेळी प्रेमाने सत्त्व वाढवून रज आणि तम ही पूर्णपणे झडून जातात, तेव्हा सद्विद्या हाती लागते आणि आत्मस्वरूपाचा बोध झाला म्हणजे सत्वाची झालेली वाढही मोडून जाते. सत्वाची वाढ झाली की, रजाचा आणि तमाचा लोप होतो हे खरे पण वाढलेले सत्त्व बाधकपणाने मोठे वाईट आहे. ती त्याची बाधा मी तुला पुढे अगदी स्पष्ट करून सांगेन.
सत्वगुण वाढला की, सर्व कर्मापासून व कार्यापासून मी अगदी अलिप्त आहे. ज्ञाता आणि अत्यंत सुखी काय तो मी, अशा कल्पनेच्या भराऱया सत्वगुणी मनुष्य मारू लागतो आणि आपणच उघडलेल्या सापळय़ात स्वतःहून अडकतो. असा जो सत्त्वगुण वाढतो, त्याचा आत्मतत्त्वानेच उपशम केला पाहिजे. त्याचे जेव्हा समूळ निर्दालन करावे, तेव्हाच समाधान प्राप्त होते. उद्धवा ! तू म्हणशील की, तिन्ही गुण जर सारखेच आहेत, तर सत्त्वाचीच वाढ कशी होईल ? त्याचे उत्तर असे की, गुण हेच गुणांना राखणदार असतात.