अध्याय तेरावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, सत्वगुण वाढवणे हे माणसाच्या हिताचं असतं कारण त्यामुळे भक्तिरूप धर्माची वाढ होते. सात्त्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्त्व गुण वाढतो आणि त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती होते. सत्त्ववृद्धीमुळे जीवही पवित्र होतो. सत्त्वाच्या उत्कर्षाचे लक्षण म्हणजे धर्मनि÷ा व स्वधर्माचे आचरण हे होय.
अंतःकरण शुद्ध झाले असता सत्त्वगुण अमर्याद वाढतो आणि माझ्या भक्तीचे लक्षण म्हणजे धर्मप्रवृत्ती वाढते. धर्माची प्रवृत्ती वाढली असता गुरुभजनावर अत्यंत प्रेम जडते किंवा माझ्या मूर्तीच्या ठिकाणी भक्ती उल्हास पावते. कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मे मला अर्पण केली
जातात.
माझ्याशिवाय इतरांची भक्ती उत्पन्न होतच नाही. गुरु आणि भगवंत हे भिन्न नव्हेत हे स्पष्ट जाणवू लागते. तेच अत्यंत थोर सत्त्वाचे लक्षण होय. सत्त्वगुण वाढला की, तो रज आणि तम यांचा नाश करतो. त्यामुळे अधर्मसुद्धा ताबडतोब नष्ट होतो. असा सात्त्वीक धर्म वाढला की, पुरुषोत्तम प्रगट होतो. सात्त्वीक पदार्थाच्या सेवनाने सत्त्वाची वृद्धी होते.
सत्त्ववृद्धीला वेदांतशास्त्र हे मुख्य आहे. त्याचा मथितार्थ ग्रहण करावा. तसेच गोदावरी, भागीरथी आदिकरून पवित्र नद्यांचा अकस्मात एक शिंतोडा अंगावर उडाला तरी पाप मुळीच शिल्लक उरत नाही किंवा ज्याकरिता ब्रह्मादिक देवसुद्धा लाळ घोटत असतात ते माझ्या प्रतिमेचे चरणामृत किंवा शाळिग्राम शिळेचे तीर्थ हेही सर्व पातकांचा नाश करते. ज्याने सर्व तीर्थे पावन होतात, ते ब्राह्मणांचे चरणतीर्थ श्रीनारायण स्वतः शिरसावंद्य करतो आणि ब्राह्मणाचे पाय आपल्या वक्षःस्थळावर धारण करतो. जे पाणी सद्गुरूच्या चरणाला लागलेले असेल ते सकळ तीर्थापेक्षाही श्रे÷ होय. ते सेवन केले असता तत्काळ उद्धार करते.
थोडक्मयात सत्त्ववृद्धीचे कारण उदक आहे. ते ह्या तीर्थाने पुण्यपावन होते आणि ते सेवन केले असता सत्त्ववृद्धीचे स्वरूप आपोआप प्रकट होते. साधु व वैराग्यशील पुरुषांची सेवा करावी. कारण त्यांच्या संगतीने जड जीवांचा उद्धार होतो.
सत्त्ववृद्धीला कारण मुख्यत्वेकरून सत्संगतीच आहे असे समज. योगसाधना करून सत्वगुण वाढतो. त्यासाठी एकांतात आसन घालण्याचा अभ्यास पूर्ण झाला आणि चिद्धन असे परब्रह्म प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत आवड उत्पन्न झाली की, सत्त्वगुण आपोआप वाढतो. प्रेमपूर्ण अंतःकरणाने कीर्तन श्रवण करण्यामध्ये जो काळ जातो किंवा जयंत्यादि महापूजा करणे, एकादशीला जागरण करणे ह्यात जो काळ जातो तीच काळाची उत्कृष्ट सार्थकता होय. हरिकीर्तनात गाताना आणि नाचताना जो काल जातो, त्या काळाचा महिमा खरोखर मलासुद्धा पूर्णपणे सांगता येणार नाही. निरभिमानपणाने कीर्तन करणे, निर्लोभाने गाणे व नाचणे, ह्यात जो काळ जातो तो काळ मलासुद्धा शिरसावंद्य असतो. जे आशापाशाच्या फळाविरहित किंवा निष्काम कर्म असेल, त्यालाच कर्म असे म्हणावे. त्यातही उपकारासाठीच जी क्रिया करावयाची, तेच खरोखर सात्त्वीक कर्म होय. गुरूपासून दीक्षा ग्रहण करणे हा एक नवा जन्मच होय.
उद्धवा ! गुरु हाच सर्वस्वी मायबाप आहे. त्याचेही लक्षण ऐक. प्रत्येकाला पाच प्रकारचे बाप असतात. एक जन्म देणारा, दुसरा उपनयन करणारा आणि तिसरा अन्न घालून सांभाळ करणारा, भयापासून सोडविणारा, बंधापासून मुक्त करणारा आणि देहाचे मरण चुकविणाराही शास्त्राप्रमाणे पिताच होतो. ह्याशिवाय एक पाचवा पिता आहे. तो पंचमहाभूतांचा निरास करतो, मृत्यूपासून सोडविणारा असतो व गर्भवासाचे दुःख निवारण करतो.
ज्याचे चरण दृष्टीस पडले असता संसारबंधन पीडा देऊ शकत नाही, तो सद्गुरु म्हणजे पिता होय. तो भाग्याशिवाय मिळत नाही. म्हणून शिष्याला सद्गुरुच माता आणि पिता असतात. तोच आपल्या ममतेने त्याला वाढविणारा असतो आणि अभिन्नभावनेच्या योगाने गुरुशिष्यांचे तादात्म्य होते.
क्रमशः