प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात सदर बाजारात अलिकडे कोणीही यावे अन शासकीय जागेत टपरी टाकून रहावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही तर टपऱया तब्बल 60 हजार रुपयांमध्ये टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या बजबजपुरीकडे पाटबंधारे विभागाने कटाक्षाने लक्ष द्यावे. अतिक्रमणे काढण्यात यावीत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक विशाल जाधव यांनी दिला आहे. त्या संदर्भात ते निवेदनही देणार आहेत.
सातारा शहरात जिथे मोकळी शासकीय जागा दिसेल तेथे अतिक्रमणे करण्याचे जुनेच तंत्र आहे. परंतु गेल्या वर्षभरात सदरबाजार भागात अतिक्रमणे फोफावली आहेत. सदरबाजारातून कृष्णा खोरे विकास महामडंळाचा कॅनॉल जातो. त्या कॅनॉल ला लागुनच शासकीय जागा आहे. शासकीय जागेत झोपडय़ा टाकण्यात येत आहेत. येथे कोण झोपडय़ा टाकते आहे. कोण कोण नव्याने राहते आहे. याचा कोणालाही ठाव ठिकाणा नाही. त्या झोपडय़ा टाकण्यासाठी 60 हजार रुपये घेतले जातात. मात्र हे पैसे कोण घेतो, पाटबंधारे विभागाचे याकडे कसलेही लक्ष नाही. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांचा कानाडोळा का होतो आहे. झोपडय़ा टाकण्यास कोण उद्युक्त करते आहे. हे सगळे गौडबंगाल असून त्यांच्या दुर्लक्षामुळे कॅनॉलच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर झोपडय़ाचे अतिक्रमण वाढू लागल्याचे सध्या चित्र आहे. त्याचा त्रास स्थानिकांनाही होवू लागला आहे.
पाटबंधारे खात्याने पाहणी करुन कारवाई करण्यात यावी
सातारा शहरातील सदरबाजार भागातील कॅनॉलच्या कडेने कोणीही झोपडय़ा टाकून राहत आहे. त्याची पाटबंधारे खात्याला कशी माहिती नाही. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांनी चौकशी करुन कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेवक विशाल जाधव यांनी दिला आहे.