प्रतिनिधी/ सातारा
पालिकेचे बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांच्या विभागात विकास कामांचे तीन तेरा वाजले आहेत. सदरबझार परिसरात पावसातही काम सुरू असून सदर काम किती दिवस टिकणार ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सदरबाजार परिसरात पालिकेचा अजब कारभार सुरू असून टक्केवारीसाठी हे काम रेटून नेले जात असल्याचा असा आरोप होत आहे.
सदरबझार परिसरात रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. हे काम घाई गडबडीत केले जात असून जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात काम होणे अपेक्षित होते. आता हे काम पालिकेच्या ठेकेदाराने हाती घेतले आहे. अवकाळीच्या झालेल्या पावसात हे काम सुरूच होते. ठेकेदाराने घाई गडबडीत काम हाती घेतल्याने दर्जेदार रस्ता होणार का?, पहिल्याच पावसात केलेला रस्ता वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान टक्केवारीसाठी पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप होत आहे.