नागरिक हंडा मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील पूर्व भागाला पाणी पुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येतो. पूर्व भागातली पाण्याची समस्या सातत्याने गंभीर होवू पहात आहे. केवळ पंधरा मिनिटे अपूऱया दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कसाई गल्ली, लॅण्ड रेकॉर्ड गल्ली यासह भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने जीवन प्राधिकरण कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात आहेत.
सातारा शहरातील पूर्व भागाला कृष्णा नदीच्या संगम माहुली येथील उपसा केंद्रातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करते. या परिसरात अगोदरच पाण्याच्या वारंवार समस्या होतात. यापूर्वी नागरिकांनी अनेकदा रस्ता रोको आंदोलने केली. गेल्या एक महिन्यापासून सदर बाजार परिसरातील कसाई गल्ली, लॅण्ड रेकॉर्ड गल्ली यासह विविध भागात पाण्याची टंचाई आहे. तेथील नागरिकांनी पाण्याच्या टंचाईची समस्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बोलूनही दाखवली आहे. परंतु प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुबलक पाणी पुरवठा झाला नाही तर या परिसरातील नागरिक जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात आहेत.
नाही तर प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बील अव्वाच्या सव्वा पाठवते अन् पाणी अपूऱया दाबाने देते. जर पाणी अपूऱया दाबाने देत असेल तर आम्हाला नागरिकांसह प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा नगरसेवक विशाल जाधव यांनी दिला आहे.