शिवराज काटकर / सांगली
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे सर्व नेते कोशात गेल्यासारखी स्थिती असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती अशी ओळख असलेले शेतकरी नेते सदाभाऊ खोत सक्रिय होत आहेत. पण यावेळी त्यांचे सक्रिय होणे स्वत:चा राजकीय पक्ष स्थापण्यासाठी असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेची विस्तारीत राज्यकार्यकारणी बैठक 18 जानेवारीला औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. तर कोअर कमिटीची बैठक त्याच्या पूर्वसंध्येला होत आहे.
सदाभाऊ खोत यांचा हा निर्धार नव्या पक्षाची स्थापना करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची मते आजमावण्यासाठी असल्याची चर्चा आहे. भाजपचा मित्र पक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना कार्यरत होती. कृषी राज्यमंत्री झाल्यानंतर शेतकरी संप, शेतकरी मोर्चे आणि अनेक कसोटीच्या वेळी खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली. फडणवीस यांचा मंत्रिमंडळातील विश्वासू अशी तीन वर्षे प्रतिमा जपली. पण या काळात त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपने पक्ष संघटनेत सामावून घेऊन विविध पदे, स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेदवारी देण्याची त्यांची अपेक्षा होती. विधानसभेला सुध्दा एकही जागा न मागता बिनशर्त पठिंबा देण्याचीही त्यांनी तयारी दर्शवली होती. मात्र खुद्द खोत यांच्या उमेदवारीला विरोध करण्यापासून त्यांच्या निकटर्तीयांना डावलले गेले. आता भाजप पायउतार झाला तरी पक्ष संघटना सदाभाऊ समर्थकांना सामावून घेत नसल्याची खदखद सातत्याने कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आता भाजप पासून अंतर ठेवून आपलाच पक्ष काढायचा का? यावर मते आजमावण्यासाठी खोत यांनी मेळावा आयोजित केला आहे. तसे झाले तर तो भाजपला धक्का देणारा निर्णय ठरणार आहे.
या निर्धार मेळाव्याला आमदार सदाभाऊ खोत, तसेच प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष दिपक भोसले, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष सिमाताई पवार आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी 18 जानेवारी 2020 रोजी गुलाबविश्व मंगल कार्यालय, सेंट्रल नाका रोड, एस पी बंगल्याजवळ,टि व्ही सेंटर हडको, औरंगाबाद येथे सकाळी 8 वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन रयत क्रांती संघटनेतर्फे करण्यात आले आहे.