बांधकामाअभावी घरांमध्ये शिरतेय पाणी
प्रतिनिधी /बेळगाव
नेहरुनगर येथील पारसी स्मशानभूमी शेजारी नाल्याचे बांधकाम नसल्याने सांडपाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. नाल्याचे बांधकाम झाल्यास ही समस्या कायमची दूर होणार आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार कळवूनदेखील त्यांच्याकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सदाशिवनगर, नेहरुनगर, आझमनगर येथील सांडपाणी थेट पारसी स्मशानभूमीपर्यंत जाते. या परिसरात रहिवाशांची संख्या वाढल्यामुळे सांडपाण्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु या नाल्याचे बांधकाम नसल्याने जिकडे तिकडे पाणी जात आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. नुकत्याच झालेल्या पावसात पाणी घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे याची दखल घेऊन नाल्याचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे.