सूर्याच्या उदय अस्ताने दिवस रात्र होतात व काळ पुढे सरकतो त्याप्रमाणे मार्गक्रमण करीत भगवंताचा रथ इंद्रप्रस्थ नगरीत पोहोचला. त्याच्या सोबत कालिंदी होती. कृष्ण कालिंदीला सोबत घेऊन आला आहे, ही वार्ता सेवकांनी युधि÷िराला सांगितली. अत्यंत आनंद झालेला युधि÷िर नकुल सहदेवासह कृष्णाला सामोरा गेला. कृष्णाला कालिंदी योग्य पत्नी आहे हे जाणून त्यांनी उभयतांचे उत्साहाने स्वागत केले. स्त्रियांनी दांपत्याची दृष्ट काढली.
अनेक वाजंत्रांचिया ध्वनि । घाव घातला पैं निशाणीं । परमोत्साहें चक्रपाणि । राजसदनीं प्रवेशला । शिबिकारूढ येऊनि कुंती । नेली कालिंदी आतौती । पाहोनि लावण्य अवयवकांति । सदैव म्हणती हरिरमणी । इचिया सुकृता नोहे सीमा । जिणें वरिलें पुरुषोत्तमा । उभयतांची लावण्यगरिमा। अयोग्य ब्रह्मा कथावया । मा इतरांचा पाड किती । नर सुर किन्नर मंदमति । मुनिवर तेही अल्पसुकृती । केंवि अवगमिती भगवंता । असो धर्माच्या अंतःपुरिं । द्रौपदीप्रमुख समस्त नारी । कालिंदीची सौभाग्यथोरी। सौंदर्यकुसरी प्रशंसिती ।
वाजंत्र्यांच्या वाद्य गजरात कृष्णाने कालिंदीसह पांडवांच्या राजप्रासादात प्रवेश केला. कुंती आंतरगृहातून बाहेर आली. तिने कालिंदीचे स्वागत केले व ती कालिंदीला आत घेऊन गेली. तिथे सर्व स्त्रिया कालिंदीचे मोहक सौंदर्य पाहू लागल्या. ही सदैव हरि रमणी होईल, अशी त्यांची खात्री पटली. त्या स्त्रिया म्हणू लागल्या. या कालिंदीच्या भाग्याला सीमा नाही कारण तिने आपला पती म्हणून हरिला वरले. या दोघांच्या लावण्याचे वर्णन ब्रह्मदेवालाही करता यावयाचे नाही, मग इतरांचा पाड तो किती? नर, सुर, किन्नर हे तर ब्रह्मदेवाशी तुलना करता मंदमतीच नाहीत काय? मुनिवरही अल्प भाग्याचे! त्यांना भगवंत भेटण्यासाठी किती सायास पडतात, जो कालिंदीला सहज प्राप्त झाला आहे. धर्मराजाच्या अंतःपुरात द्रौपदीसह सर्व स्त्रिया अशाप्रकारे कालिंदीच्या सौभाग्याची व सौंदर्याची स्तुती करीत होत्या.
यावरी श्रीकृष्ण सभास्थानीं । धर्मराजाच्या सन्निधानीं । बैसले असतां पाण्डवीं वचनीं। विनंति केली ते ऐका।जेव्हां पाण्डवीं संप्रार्थिला । अघटितघटनापटीचा दाद्ला । तेव्हांचि आज्ञापिता जाला । विश्वकर्म्याला संकेतें । पार्थ पाची पाण्डुकुमर । त्यांचें अद्भुत विचित्रतर । करविता जाला शाङ्गधर। जें अमरेंद्रपुर भूलोकीं । विश्वकर्मा जो देवशिल्पिक। तेणें कृष्णाज्ञेस्तव सम्यक । विचित्र नगर रचिलें देख। निर्जरलोकतुळणेचें ।सर्व सौकर्यें जिये ठायीं । चिंता हृद्रोगव्यथा नाहीं । अमरेंद्रासम पाटव देहीं । प्रज्ञाविजयीं गीष्पतिवत् । पाण्डवांसहित पापान्तक । तेथ वसोनि मन्मथजनक । करिता जाला जें कौतुक। तें तूं नावेक अवधारिं ।
त्यानंतर कृष्णासह पांडव सभागृहात बसले असता पांडवांनी कृष्णाला विनंती केली -हे कृष्णा! आम्हाला इंद्रप्रस्थाचे राज्य प्राप्त झाले असले तरी आम्हाला शोभेल अशी ही नगरी नाही. यासाठी काय करावे ते सांग? त्यावर भगवान हसले व त्यांनी देवांचा स्थापत्यतज्ञ विश्वकर्मा याला तिथे बोलाविले.
Ad. देवदत्त परुळेकर