वार्ताहर / कुन्नूर :
जड जीवाच्या उद्धारासाठी सद्गुरु अवतार घेतात. त्यांच्या कृपाप्रसादाने व मार्गदर्शनाने मनुष्य देहाचे सार्थक होते. त्याकरिता सद्गुरुंना शरण जाऊन त्यांची सेवा केल्यास त्यांच्या कृपेचा आपल्याला लाभ होईल. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल केल्यास आपले जीवन धन्य होईल. त्यांच्या कृपेविना मनुष्य देहाचा उद्धार अशक्य आहे, असे प्रतिपादन बाळ महाराज रेंदाळकर यांनी केले.
येथील बिरदेव देवस्थान मंडळ, हनुमान देवस्थान मंडळ व सद्गुरु बाळूमामा कुन्नूरकर भक्त मंडळाच्यावतीने संयुक्तपणे आयोजित बाळूमामांच्या 19 व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ग्रा. पं. अध्यक्षा रेखा उपाध्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळय़ाचा प्रारंभ झाला. त्यानंतर गणेश पूजन, प्रतिमा पूजन, मूर्ती पूजन, ग्रंथपूजन, वीणा पूजन मान्यवरांच्या हस्ते करून गावकामगार पाटील विजयराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक बाबुराव सोनाळे यांनी तर पौरोहित्य पवन कुलकर्णी यांनी केले. तत्पूर्वी बाळूमामांच्या पादुका हनुमान मंदिरातून पालखी मिरवणुकीने समाधी मंदिरात आणण्यात आल्या. तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, टाळ-मृदंगाचा गजर व विठ्ठलनामाच्या गजरात ही पालखी मिरवणूक समाधी मंदिरात आल्यानंतर पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी ग्रा. पं. सदस्य श्रीकांत कणगले, दत्ता शिंदे, सर्जेराव पाटील, विठ्ठल संस्थेचे चेअरमन भरत चेंडके, माजी अध्यक्ष रामचंद्र चेंडके, अशोक तावदारे, शंकर ढंग, महेंद्र जाधव, विजय चेंडके, पंडू धनगर, सुर्याप्पा धनगर, भैरु तावदारे, आण्णापा बन्ने, अशोक पाटील, मल्लाप्पा खोत, धोंडीराम पाटील, रामचंद्र कुलकर्णी महाराज, भाऊसाहेब उमळवाडकर महाराज, मधुकर धनगर, वासू धनगर, सिद्धाप्पा बनकर, दत्ता धनगर, अजित आनुसे, अजित कोळेकर, भागोजी धनगर, विठ्ठल बन्ने, सुरेश कोळेकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.