अध्याय बारावा
भगवंत उद्धवाला सद्गुरूंच्याबद्दल सांगत आहेत ते म्हणाले, गुरु म्हणजेच परमात्मा, परेश आहे असा ज्याचा दृढविश्वास आहे त्याचे देव अंकित झालेला असल्याने देव स्वतःहूनच त्याच्या घरी येतात. आता असा उत्तम शिष्य सद्गुरूंचे भजन कसे करतो त्याचे स्वरूप ऐक. गुरूची सेवा करण्यासाठी त्याचा देह मनाच्याही पुढे धावत असतो व सर्व सेवा मी एकटाच करीन एवढय़ा महत्त्वाकांक्षेने तो तयार झालेला असतो. सेवा जितकी अधिक पडेल तितका हा अधिक उत्साहाने सेवेला तयार होऊन राहतो. त्याने सर्व देह केवळ सेवेप्रीत्यर्थच वाहिलेला असतो. गुरुसेवेमध्येच त्याला विश्रांती वाटते. सेवेच्या आवडीमुळे अर्धघटका देखील विश्रांती घेत नाही. आवडीच्या अधिकाधिक भराने गुरुभजनामध्ये वाढतीच गोडी वाटत असते. नित्य गुरूची सेवा करताना नित्य नवाच प्रेमाचा भर उत्पन्न होतो. सद्?भक्तीच्या इच्छेने गुरूच्या चरणांपाशी त्याने जीवाला विकूनच टाकलेले असते. आळस त्याच्यापाशी येण्याचेच विसरतो. विश्रांतीला स्थानच नाहीसे होते. गुरुसेवेच्या संभ्रमानेच तो भुलून गेलेला असल्यामुळे इतर विषय सेवन करण्याचे विसरूनच जातो. गुरूचे पादसेवन करताना तो झोपेलाच विसरतो. जांभई देण्यापुरतीसुद्धा सवड त्याला मिळत नाही. मुखामध्ये सद्गुरूचे नाम, हृदयामध्ये सद्गुरूचे प्रेम आणि देहाला सद्?गुरूचे कर्म, हेच रात्रंदिवस न थांबता चालू असते. मन हे गुरुसेवेत गुंतलेले असल्यामुळे बायको, मुले व धन ह्यांचाही विसर पडतो. मनाचीही आठवण विसरतो व मी कोण ह्याचेही स्फुरण राहात नाही.
त्याचा भजनाचा उत्साह आश्चर्यकारक असतो. भजन करताना स्वतःच्या देहाचीसुद्धा आठवण राहात नाही. अशा थोर गुरुसेवेचा महिमा विलक्षण आहे. कारण शिष्याचा सर्व आत्मभाव गुरुचरणीच लागून राहतो. जर प्रारब्धानुसार एखाद्या प्रसंगी गुरूची ताटातूट झाली, तरी प्रेमाचा जिव्हाळा तुटत नाही आणि उलट भजनामध्ये अधिक भक्ति जडते. गुरूचे राहण्याचे जे गाव असते, तेथेच सर्व मनोधर्म राहतो. गुरूचे ध्यान तेच आपले धर्मकर्म असे समजून तो सेवेची खटपट सोडीत नाही. गुरूच्या मूर्तीचीच त्याला सवय झालेली असल्यामुळे ती गुरुमूर्ती तो हृदयाकाशामध्येच स्थापित करतो आणि मग अनेक प्रकारच्या भजनरंगांत रंगतो. त्याची भजनाची आवड काय सांगावी ?
चित्स्वरूप हीच त्याची पौर्णिमा व गुरु हा त्यातील पूर्णचंद्र होय. त्याच्याखाली स्वतः तृषित चकोरपक्षी होऊन बसतो. मग स्वानंदबोधरूपी चंद्रकिरण तो निरंतर स्वतः सेवीत असतो. चिदाकाशामध्ये सद्गुरूला सूर्य करून आपण सूर्यकांत मणि होतो आणि त्याच्या दिव्य तेजाने देदीप्यमान होऊन आपल्या प्रभावाने मायारूप वनाची होळी करतो. सद्गुरूच्या कृपामृतडोहात आपण त्या ठिकाणी तरंग होतो आणि अंतर्बाह्य सारे गुरूचेच स्वरूप आहे असे समजून हृदयामध्ये तीच भावना धरतो. आपला खरा धनी जो सद्गुरु, एक निर्विकल्प कल्पतरूच आहे असे मानतो व त्याच्या छायेखाली बसून अन्य काही न मागता गुरुभक्तीचाच वर मागतो. सद्गुरूला कामधेनु करून आपण तिचे वासरू आहोत अशीच कल्पना करतो आणि तिच्याकडून ज्ञानरूप जिव्हेने प्रेमाने चाटवितो व स्वानंदाचा पान्हा सेवन करतो. हे गुरुदेवा ! तुझ्या सर्व वृत्तींची सेवा मीच करावी अशी सद्?भक्तीने त्याची प्रार्थना करून म्हणतो, हे कृपानिधे ! हाच मला वर द्यावा. गुरुनाथाने प्रसन्न होऊन वरदहस्त मस्तकी ठेवून तसा वर दिला असता आनंदाने त्याचे मन उसळू लागते व मला वर मिळाला, मी धन्य झालो असे म्हणतो. असा वर मिळवून तीच सेवा तो प्रेमाने आदरपूर्वक करू लागतो. गुरुभक्तीचा भावार्थ अत्यंत धन्य होय. गुरुभजनाचे असंख्य प्रकार आहेत.
सद्?गुरुची मन, बुद्धी, अंतःकरण इत्यादि दशेंद्रिये असतात, त्यांच्या सर्व हालचाली मीच व्हावे असें तो मनोभावाने इच्छीत असतो. सद्?गुरु जे जे भोग भोगतात, ते खरोखर मीच होईन. अशा प्रकारे मीच एक गुरुभक्तिस्वरूप होऊन राहीन. दुसरी स्थितीच होऊ देणार नाही असा निश्चय तो करतो. या निश्चयाबाबत सविस्तर जाणून घेऊयात पुढील भागात …
क्रमशः