राजस्थानच्या धावपटू सुफिया यांची 6 हजार किमीची दौड
प्रतिनिधी / कराड
गिनीज रेकॉर्ड बुकमध्ये अनेक विक्रम नोंदवलेल्या राजस्थानच्या विख्यात धावपटू सुफिया यांनी दिल्ली-मुंबई-बंगळुरू-चेन्नई-कोलकाता-दिल्ली अशी 6 हजार किलोमीटरची सद्भावना दौड सुरू केली आहे. ही दौड कराडमध्ये आल्यानंतर कराड जिमखान्याच्या वतीने सुफिया यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सुफिया यांनी यापूर्वी काश्मिर ते कन्याकुमारी’, इंडिया गेट दिल्ली ते गेट वे ऑफ इंडिया’, दिल्ली-आग्रा-जयपूर-दिल्ली अशा दौड विक्रमी वेळेत पूर्ण करून अनेक विक्रम गिनीज बुकमध्ये प्रस्थापित केले आहेत. सध्या त्यांनी दिल्ली-मुंबई-बंगळुरू-चेन्नई-कोलकाता-दिल्ली अशी 6 हजार किलोमीटरची सद्भावना दौड सुरू केली आहे. यात त्या रोज 55 किलोमीटर अंतर धावून 135 दिवसांत पूर्ण करणार आहेत. त्यांचे सायकलपटू असलेले पती विकास या दौडीचे नियोजन त्यांच्या सोबतीने करत आहेत. त्यांनी स्वतः संपूर्ण भारताची तीन वेळा सायकल परिक्रमा केली आहे. यावेळी सुफिया यांनी सदस्यांनी विचालेल्या विविध प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. महाराष्ट्राच्या अतिथ्यशील स्वभावाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कोरोनाकाळात लोकांच्या मनात जे नकारात्मक भाव निर्माण झाले आहेत, त्याचे सकारात्मकतेत रूपांतर व्हावे या प्रेरणेतून मी भारत सद्भावना दौड करत आहे, असे उद्गार धावपटू सुफिया यांनी काढले.
कराड जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा, सचिव सुधीर एकांडे, विवेक ढापरे, सुचिता शहा, विवेक कुंभार, सचिन गरुड, प्रमोद गरगटे, अभिजित घाटगे, दीपक शहा, शंकर चव्हाण, डॉ, चिन्मय विंगकर आदींची उपस्थिती होती. कराड जिमखान्यातर्फे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा व सुचिता शहा यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कराड जिमखान्याच्या कार्याचा विवेक ढापरे यांनी परिचय करून दिला. डॉ. चिन्मय विंगकर यांनी प्रास्ताविक तर अभिजित घाटगे यांनी आभार मानले. पंकज हॉटेलच्या हिरवळीवर झालेल्या या कार्यक्रमास लक्षणीय उपस्थिती होती. सकाळी कराड जिमखान्याचे सदस्य अभिजित घाटगे व इतर 25 जणांनी सुफिया यांच्या बरोबर खोडशी ते नांदलापूर’ हे अंतर धावत जाऊन त्यांना कोल्हापूरसाठी निरोप दिला.