पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, लॉकडाऊनसंबंधी सर्व मुख्यमंत्र्यांशी शनिवारी चर्चा, रूग्णसंख्येत आणखी वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्याची स्थिती सामाजिक आणीबाणीसारखी आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी सर्व पक्षांच्या संसदीय नेत्यांशी चर्चा करताना व्यक्त केले. अशा परिस्थितीत लॉकडाऊन हा महत्वाचा मुद्दा आहे, यावर चर्चेत एकमत झाले असल्याचे समजते. ही चर्चा बुधवारी येथे पार पडली. सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्यांची मते व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी या सर्व मतांची नोंद केली असून ते प्रशासनाची भूमिका येत्या काही कालावधीतच निर्धारित करणार आहेत.
येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊनच्या संदर्भात चर्चा होणार आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही, यासंबंधीचा अंतिम निर्णय या चर्चेनंतरच होणार आहे. आधीच्या कार्यक्रमानुसार लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंतच आहे. मात्र अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तो वाढवला जावा अशी मागणी केल्याने केंद्र या मागणीवर विचार करणार आहे.
लॉकडाऊन वाढणार : काँगेसचा संकेत
लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होणार हे जवळजवळ निश्चित आहे, असे अप्रत्यक्ष विधान काँगेसच्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व्यक्त केले. ते जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही सहमत असू, असाही संकेत काँगेस नेत्यांनी दिला आहे.
कठोर निर्णय अनिवार्य
सामाजिक आणीबाणीच्या या स्थितीत काही अत्यंत कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे पंतप्रधान मोदींचे म्हणणे आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासक यांच्याकडून माहिती गोळा केली आहे. त्यानुसार कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तसाच निर्णय होण्याची शक्यता आहे.
पॅकेजची मागणी
अधिकधिक लोकांच्या चाचण्या करणे आणि लॉकडाऊनमुळे कामे गेलेल्या गरीब वर्गातील लोकांना साहाय्य करणे यासाठी राज्यांना मोठय़ा प्रमाणात पैशाची आवश्यकता आहे. ही पैशाची आवश्यकता भागविण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांच्याशी बुधवारी झालेल्या चर्चेत करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. या मागणीवर लवकरच निर्णय घेतला जाण्याचा संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिला.
चोवीस तासांमध्ये 773 नवे रूग्ण
देशातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असून मंगळवार संध्याकाळी 6 ते बुधवार संध्याकाळी 6 या कालावधीत ती 773 ने वाढली. तर मृतांची संख्या 9 ते वाढली आहे. नव्या रूग्णांमध्ये तबलीग कार्यक्रमात भाग घेतलेल्याची संख्या 300 हून अधिक आहे. या कार्यक्रमाशी संबंधित रूग्णांची संख्या आता 2 हजारहून अधिक झाली आहे. बुधवार संध्याकाळपर्यंत देशात एकंदर रूग्णांची संख्या 5 हजार 194 झाली आहे. तसेच मृतांची संख्या 149 आहे. 404 रूग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत. देशभरात आतापर्यंत एकंदर 1 लाख 21 हजार 271 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अशी महत्वपूर्ण माहिती आरोग्य विभाग आणि आयसीएमआर यांच्याकडून देण्यात आली.
इंदूरमध्ये पाच हल्लेखोरांना अटक
लोकांना लॉकडाऊन पाळण्यासाठी विनंती करणाऱया पोलिसांवर मध्यप्रदेशातील इंदूर येथे हल्लेखोरांनी प्रचंड दगडफेक केली. यात दोन पोलीस जखमी झाले. विशिष्ट लोकवस्तीच्या चंदन नगर या भागात ही घटना बुधवारी दुपारी घडली. त्यानंतर पोलीसांनी धडक कारवाई करत 5 हल्लेखोरांना अटक केली. जावेद खान (25), नासीर खान (58), साली खान (50) आणि सामीर अन्वर (22) अशी हल्लेखोरांपैकी चार जणांची नावे आहेत.
मानसिक तयारी
ड केंद्र व राज्य सरकारांकडून लॉकडाऊन वाढविण्याची मानसिक तयारी
ड विविध पक्षांच्या राज्यसरकारांचा केंद्राकडे कालावधी वाढीसाठी आग्रह
ड तबलीगच्या कार्यक्रमाशी संबंधित रूग्णांची संख्या गेली 2000 पर्यंत