माजी अष्टपैलू युवराज सिंगची खरमरीत टीका,
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्याच्या भारतीय क्रिकेट संघात केवळ दोनच रोल मॉडेल आहेत, ज्यांच्याकडे अन्य सर्व खेळाडू आदराने पाहतात. पण, या दोघांचा अपवाद वगळता अन्य एकही खेळाडू असा नाही, ज्याच्याबद्दल युवा खेळाडूंना आदर वाटेल, असे रोखठोक प्रतिपादन माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केला. आताचे सर्व खेळाडू सोशल मीडियामध्ये बुडालेले असतात. त्यामुळे, त्यांच्याकडे संवादासाठी वेळही नाही, असे तो आवर्जून म्हणाला. युवराजने वनडे उपकर्णधार रोहित शर्माशी इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट केले त्यात त्याने ही मते मांडली.
रोहितने या लाईव्ह चॅटमध्ये अनुभवी युवराज सिंगला सध्याच्या व मागील संघात किती फरक आहे, असा प्रश्न केला. त्यावर युवराज सिंग बोलत होता. ‘जेव्हा मी संघात आलो किंवा जेव्हा तू (रोहित) संघात आलास, त्यावेळी आपले वरिष्ठ खेळाडू अतिशय शिस्तबद्ध होते. शिवाय, लक्ष भरकटले जावे, यासाठी त्याकाळी सोशल मीडिया आजच्या इतका मजबूत नव्हता. त्यामुळे, आपल्या सर्वांचे लक्ष आपले वरिष्ठ खेळाडू कसे वागतात, ते माध्यमांशी कशा पद्धतीने संवाद साधतात, ते लोकांशी कसे बोलतात, याकडे असायचे. याचे कारण असे की, तेच खेळाडू आपल्या दृष्टीने खेळाचे आणि देशाचे राजदूत असायचे. पण, आता तशी परिस्थिती अजिबात राहिलेली नाही’, असे युवराज येथे म्हणाला.
प्रतिमेची काळजी घ्या
‘आताही तू विचारलेस तर मी हेच सांगेन की, भारतीय संघाकडून खेळल्यानंतर किंवा खेळत असताना देखील आपल्या प्रतिमेची काळजी आपण घ्यायलाच हवी. मात्र, आताच्या संघावर एक नजर टाकली तर त्यात विराट व तू, अशा दोघांचा अपवाद वगळला तर मला एकही खेळाडू त्या तोडीचा दिसत नाही. उर्वरित सर्व खेळाडूंचा प्रवास तळय़ात-मळय़ात स्वरुपाचा असल्याचा जाणवतो. ते फक्त संघात येत राहतात आणि जात राहतात. आताच्या संघात खूप वेगळी परिस्थिती आहे. कोई भी किसीको कुछ भी कह देता है’, असे युवराज पुढे रोहितला उद्देशून म्हणाला.
इन्स्टाग्रामवरील या लाईव्ह चॅटमध्ये रोहितने युवराजच्या मताला छेद देणारे एकही वक्तव्य केले नाही. ‘मी ज्यावेळी संघात आलो, त्यावेळी पीयूष चावला, सुरेश रैना व मी, असे तिघेच नवोदित होतो. आताचे वातावरण सहजतेचे आहे. मी स्वतः युवा खेळाडूंशी सातत्याने बोलत असतो. जवळपास पाच ते सहा खेळाडूंशी माझा सातत्याने संवाद असतो’, असे तो म्हणाला.
परीक्षण होतच राहणार
‘मी ऋषभ पंतशी देखील बराच बोलतो. खरं तर मधल्या काळात त्याच्यावर बरेच टीकास्त्र होत होते. त्याच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवले गेले आणि तो अपयशी ठरल्यास त्याच्यावर आणखी जहरी टीका केली गेली. माध्यमांनी त्याच्याविषयी लिहिताना विचार करायला हवा, असे मला वाटते. पण, माझ्या मते, जेव्हा भारतीय संघातून खेळता, त्यावेळी तुमचे परीक्षण होतच राहणार, हे साहजिकच आहे’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
नव्या खेळाडूंच्या मानसिकतेविषयी बोलताना युवराज म्हणाला की, नव्या पिढीतील खेळाडूंना फक्त मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणेच आवडते. कसोटी क्रिकेट खेळण्यास ते फारसे इच्छुक नसतात.
नव्या खेळाडूंना कसोटी नको
‘मला एकदा सचिन म्हणाला होता की, जर मैदानावर तुमची कामगिरी उत्तम होत असेल तर बाकी सर्व गोष्टी तुमच्या मागे धावत राहतील. त्यासाठी तुम्ही स्वतंत्र प्रयत्न करण्याची गरज नाही. मी एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेलो होतो, त्यावेळी मी तेथील खेळाडूंशी संवाद साधला. त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवले की, नव्या खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्यात फारसे स्वारस्य नाही, जे खरे, अभिजात क्रिकेट आहे. त्यांना फक्त वनडे क्रिकेट खेळण्यातच रस होता’, असे निरीक्षण या डावखुऱया माजी फलंदाजाने पुढे नोंदवले.
‘असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे आणि सध्या ते मुख्य प्रवाहात नाहीत. माझ्या मते अशा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात नसताना प्रथमश्रेणी, स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला हवे. यामुळे, देशाच्या कानाकोपऱयातील विविध प्रकारच्या खेळपट्टय़ांवर खेळल्याने ते अधिक अनुभवसंपन्न होऊ शकतील, असे युवी येथे शेवटी म्हणाला.
आताचे खेळाडू सोशल मीडिया व पाटर्य़ांमध्येच व्यस्त
‘आम्ही खेळत असताना आतापेक्षा खूप वेगळी परिस्थिती होती. सध्याच्या संघातील कनिष्ठ खेळाडूंचा सोशल मीडिया आणि पाटर्य़ांमध्येच खूप वेळ जातो. आम्ही आमच्या काळात याबद्दल विचारही करु शकत नव्हतो. कारण, आम्हाला त्यावेळी अशी भीती होती की, जर आम्ही काही चूक केली तर आमचे वरिष्ठ खेळाडू आम्हाला त्याबद्दल सुनावतील. सध्या मात्र तसे चित्र अजिबात दिसत नाही’, अशी खंत युवराजने व्यक्त केली.
तो प्रकार क्वचितच घडला असावा!
हार्दिक पंडय़ा व केएल राहुल हे करण जोहरच्या ‘कॉफी वुईथ करण’ कार्यक्रमातील चुकीच्या टिपणीमुळे वादात सापडले. त्याचा उल्लेख करताना युवराजने आपल्या कारकिर्दीदरम्यान असा चुकीचा प्रकार क्वचितच घडला असावा, असे नमूद केले.