जिल्हय़ात आणण्याबाबत संभ्रम लवकरच दूर : जिल्हावासीयांनी 17 पर्यंत संयम बाळगावा
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा केंद्राने ग्रीन झोनमध्ये समावेश केला, ती एक तांत्रिक चूक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असला तरी जिल्हय़ाची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू आहे. त्यामुळे जिल्हय़ातील जनतेने आतापर्यंत जसा संयम दाखवला तसाच संयम 17 मेपर्यंत दाखवावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
पुणे, मुंबईतील चाकरमान्यांना जिल्हय़ात आणण्याबाबत संभ्रमावस्था आहे. ती लवकरच दूर होईल. सध्या नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात चाकरमान्यांना शाळा, इतर इमारतीत ठेवण्याबाबत तयारी सुरू आहे. परंतु हा तयारीचा भाग आहे. चाकरमान्यांना आणायचे झाल्यास कितपत तयारी आहे, याचा आढावा घेण्याचाच हा भाग असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कोरोना फैलाव रोखण्यासंदर्भातील तयारी आणि पाणीटंचाई तसेच अन्य कामांचा आढावा अधिकाऱयांच्या बैठकीत घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
स्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न
‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश आले आहे. जे रुग्ण मिळाले ते मुंबईहून आलेले होते. सिंधुदुर्गातील एक रुग्ण नाही. प्रशासन आवश्यक खबरदारी घेत आहे. जनतेचेही सहकार्य लाभत आहे. जनतेने आतापर्यंत जसा संयम शासनाच्या निर्देशानुसार दाखवला तसा संयम 17 मेपर्यंत पाळावा. जे काही उद्योग-व्यवसाय सुरू होतील ते अटी-शर्थींना अधिन राहून होतील. हळूहळू यंत्रणा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न आहे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आमदार दीपक केसरकर आजारी आहेत. मात्र, त्यांनी आमदार फंडातून सावंतवाडीत अकरा हजार, दोडामार्गात तीन हजार आणि वेंगुर्ल्यात सात हजार मास्क वाटले आहेत. याशिवाय सॅनिटायझरचे वाटप केले आहे. आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हेदेखील चांगले काम करत असल्याचे ते म्हणाले.
गोव्याला पर्यायी यंत्रणा करावी लागेल!
गोव्याकडून सध्या जिल्हय़ातील लोकांना सहकार्य मिळत नाही. दोडामार्ग भागातील लोकांना पेट्रोलसाठी तर रुग्णांवर उपचारासाठी गोव्यात जावे लागते. परंतु गोव्याकडून सहकार्य मिळत नाही. कोरोनाची साथ संपल्यानंतर स्थिती पूर्वपदावर येईल. मात्र, तोपर्यंत आपल्याला पर्यायी यंत्रणा उभारावी लागेल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दशावतारी संघांना पाच लाखाची मदत
सिंधुदुर्ग जिल्हय़ात दशावतार संघांना शासनाकडून मदत मिळत नसली तरी शिवसेनेतर्फे या संघांना आम्ही मदत करणार आहोत. 40 संघांना पाच लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. या संघांना मदत करावी, अशी खासदार विनायक राऊत यांची मागणी होती. त्यानुसार ही मदत करण्यात येत असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, रुपेश राऊळ, वसंत केसरकर, शब्बीर मणियार, अशोक दळवी, भारती मोरे, राजन पोकळे, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, नारायण राणे,
विक्रांत सावंत, माजी सभापती पंकज पेडणेकर, अनारोजीन लोबो आदी उपस्थित होते.
दरम्यान, आढावा बैठकीला प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे उपस्थित होते.