ज्येष्ठ काँगेस नेते कपिल सिब्बल यांच्या विधानाने खळबळ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्याच्या काळात भारतीय जनता पक्षाला कोणताही भक्कम राजकीय पर्याय नाही, असे स्पष्टोक्ती ज्येष्ठ काँगेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. भाजप समर्थ असल्याने आणि त्याला पर्याय दृष्टिपथात नसल्याने राजकीय पोकळी निर्माण झाली असून काँगेस ती पोकळी भरून काढू शकते. मात्र, त्यासाठी काँग्रेसला उदासिनता झटकून कार्यरत व्हावे लागेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून काँगेसमधील दुफळी पुन्हा एकदा उघड झाल्याचे दिसत आहे, असे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले.
भाजपला समर्थ पर्याय निर्माण करायचा असेल तर काँगेसने आपल्या संघटनेच्या सर्व स्तरांवर व्यापक परिवर्तन करण्याची आवश्यकता सिब्बल यांनी बोलून दाखविली. त्यासाठी संघटनात्मक निवडणुका लवकरच होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या कोरोना स्थिती लक्षात घेऊन या निवडणुका टाळण्यात आल्या आहेत. काँगेसने विचारसरणीचाही फेरविचार केला पाहिजे असे त्यांनी सुचविले.
पंतप्रधान मोदींवरही टीका
भाजपला सध्याच्या स्थितीत पर्याय नसला तरी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने राज्य चालविण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यामुळे काँगेसने कंबर कसून काम सुरू केल्यास भाजपला पर्याय देण्याची संधी हा पक्ष मिळवू शकतो. पण प्रयत्न अविश्रांतपणे केले पाहिजेत अशी टिप्पणीही सिबल यांनी केली.
युवा नेत्यांनी का पक्ष सोडला
अलिकडच्या काळात अनेक युवक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. ज्योतिरादित्य सिंदिया, हिमांत बिस्व सर्मा, जितीन प्रसाद यांच्यासारखे प्रभावी नेते बाहेर पडले. याचे कारण शोधण्याची आणि अनुभवी नेते व तरूण नेते यांच्यात समतोल साधण्याची तातडीची आवश्यकता आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
विचारांशी फारकत हे कारण
काँगेसने निवडणुका जिंकण्यासाठी सवंग राजकारण सुरू केले. आसाममध्ये एआययुडीएफसारख्या मुस्लीम धर्मवादी पक्षाशी युती केली. हे धोरण सुयोग्य आणि सुविचारित नव्हते. बहुसंख्याकांच्या धर्मवादाप्रमाणे अल्पसंख्याकांचा धर्मवादही देशासाठी तितकाच घातक असतो हे लोकांना पटविण्यात काँगेसला अपयश आले. यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष सपशेल अपयशी ठरला, अशी कारणमीमांसा करताना त्यांनी पक्षाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
निष्कर्ष योग्य होता
सांप्रदायिकता विरुद्ध धर्मनिरपेक्षात या मुद्दय़ावर काँगेसने निवडणूक लढल्यामुळे पक्षाचा दारूण पराभव झाला, असा निष्कर्ष 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ए. के. अँटोनी समितीने काढला होता. तो अतिशय योग्य होता. त्यावर नंतरच्या काळात विचार होणे आवश्यक होते, अशीही टिप्पणी त्यांनी केली.