(अध्याय तेरावा)
माणसाला विषयांचे किती आकर्षण असते आणि त्याने कितीही प्रयत्न केला तरी ते सहजी कमी होत नाही असे भगवंतांनी उद्धवाला सांगितले. पुढे म्हणाले, मनाला आळा बसण्यासाठी मनोनिग्रहाचे लक्षण आणि साधन सांगतो. त्यासाठी साधकाने त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक आसन व प्राण यांवर विजय मिळवून मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावे. आळस आणि निद्रा ह्यांना दूर झुगारून देऊन जो सावधचित्ताने ब्रह्मभावना धारण करतो, तोच खरोखर माझ्या चित्स्वरूपाच्या अभ्यासाला हळूहळू लागतो. अभ्यासाला लागले असता त्यातील पहिले काम म्हणजे आसन स्थिर करावयास शिकणे हे होय. आसनजय साध्य झाला असता मनुष्य सहज योगमार्गाला लागतो आणि त्याचा अधिक अभ्यास केला असता प्राण आणि अपान ह्यांचीही समान स्थिती होऊ लागते. विषय हे मनाच्या आधीन असतात, मन वायूला वश असते हे लक्षात घेऊन अभ्यासाने वायूलाच वश करून घेतले, म्हणजे मन आपोआपच स्थिर होते. ह्याप्रमाणे जो हळूहळू अभ्यासाने कालाचे सार्थक करतो, तो विरक्त होत नसला तरी महान् सामर्थ्यवंत होऊन परमार्थाविषयी त्याला फारच गोडी लागते. हरिचिंतनामध्ये मन एकाग्र करीत गेले म्हणजे प्राण आणि अपान हे दोन्ही वायु एकरूप होऊन जातात. प्राणापानांची समसमान जोडी सहाही चक्रांचे पदर फोडून टाकते. असे झाले की, चित्त विषयांना सोडून देते व विषयही चित्ताला सोडून देतात. ह्याच उपदेशाने माझे सनकादिक शिष्य अभ्यासाच्या सामर्थ्यानेच अलौकिक असे आत्मज्ञानाचे सौख्य पावते झाले. मन जिकडे जिकडे जाईल, तिकडे तिकडे परब्रह्मच भरलेले आहे अशी भावना धरण्याची सवयच लागल्यामुळे, सनकादिक ब्रह्मस्वरूप झाले. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असलेल्या सनकादिकांनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती. त्यांनी असा प्रश्न केला होता की, योगाची गती अत्यंत सूक्ष्म आहे आणि आत्मस्वरूपाची स्थिती समजण्याला परम दुर्घट आहे. ती कशी समजेल ? चित्त स्वभावतःच विषयांचे ठिकाणी आसक्त राहाते आणि ते विषय वासनारूपाने चित्तात राहतात, तर मग संसारसागरातून तरून जाऊ इच्छिणाऱया मुमुक्षूने चित्त आणि विषय या एकत्र राहणाऱया दोघांना एकमेकांपासून दूर कसे ठेवावे ? आंब्याचा हंगाम ठराविक काळच असतो पण इतरवेळीही म्हणजे फळ आणि काळ ही दोन्ही नसली तरी आंब्यांची आठवण झाली की, त्यांची गोडी मनाला लगेच आठवते. त्याप्रमाणेच विषय हे एकदा चित्तात शिरले की, तेथून कधी निघत नाहीत. पत्नी माहेरी गेली, तरी ती मनातून लांब जात नाही, त्याप्रमाणे विषयही चित्ताला जखडून बसलेला असतो. ह्यास्तव चित्त आणि विषय यांची परस्पर पूर्ण ताटातूट मुमुक्षूंना घडणार कशी ? ह्याच्या निरसनार्थ एखादा उपाय स्वामीनी यथासांग सांगावा. सृष्टीनिर्मात्या श्रे÷ आणि स्वयंभू ब्रह्मदेवाला सनक इत्यादींनी असा प्रश्न विचारला परंतु त्यांची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त, म्हणजे कर्मफळाची अपेक्षा करणारी व न मिळाल्यास दुःखी होणारी असल्याकारणाने पुष्कळ विचार करूनही त्यांना प्रश्नाचा आशय कळला नाही. ब्रह्मदेवाना अग्रपूजेचा मोठा मान आहे, सर्व देवांमध्ये त्याचा महिमा श्रे÷ आहे पण सनकादिकांच्या प्रश्नाचे यथायोग्य उत्तर कसे द्यावे हे ब्रह्मदेवाला खरोखर कळले नाही कारण कर्माच्या योगाने त्याची बुद्धि मंद झाली होती. त्याला ज्ञानोपदेश करण्याचे सुचेना. प्रश्न तर अत्यंत गहन वाटत होता. त्यामुळे ब्रह्मदेव वेडा झाला. त्याचं बोलणंच खुंटलं. मग तो माझे चिंतन करूं लागला. सत्यलोकामध्ये सर्वांच्या देखत सनकादिकांनी प्रश्न केल्यावर आपल्याला मुळीच काही माहीत नाही असे त्याला म्हणवेना आणि उत्तर सांगावयास जावे तर त्याविषयी काहीच ज्ञान होईना अशी त्यांची अवस्था झाली. पुत्रांचे अज्ञान नाहीसे करण्याकरिता आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळावे म्हणून ब्रह्मदेव माझे स्मरण करू लागला, तेव्हा माझेही मन कळवळले. ब्रह्मदेव माझ्याच पोटचे अपत्य होय. पण त्याच्या दृष्टीवर कर्माच्या जाडय़तेने अज्ञानाचा पडदा आला होता. तो तत्काळ काढून टाकण्यासाठीच मी हंस झालो.
क्रमशः