प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात तीन दिवस झालेल्या सनबर्न पार्टीत ड्रग्जचा मोठा व्यवहार झाला असून, ड्रग्जचे अतीसेवन झाल्यामुळे तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. सनबर्न पार्टी आयोजकांविरोधात त्वरीत गुन्हा नोंद करून त्यांना अटक करा अशी मागणी युवा काँग्रेस समितीने केली आहे. काल मंगळवारी त्यांनी पोलीस महानिरीक्षक जस्पाल सिंग यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
वागातोर येथे 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर असे तिन दिवस सनबर्न पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी ही पार्टी वादाच्या भोवऱया असते. समस्थ गोमंतकीयांचा विरोध असतानाही या पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीत मोठय़ाप्रमाणात ड्रग्जचा बेकायदेशीर व्यवहार होत असून कोटय़ावधी रुपयांचा चुराडा केला जातो.
यावर्षी याच पार्टीत ड्रग्जचे अती सेवन झाल्याने तिन युवकांचा मृत्यू झाला आहे. व्येंकट, साई प्रसाद व संदिप कोट्टा अशी त्या युवकांची नावे असून तिघेही युवक परप्रांतीय आहेत. हे युवक गोव्यात सुट्टीची मजा लुटण्यासाठी आले होते. मात्र त्यांनी ड्रग्जचे अती सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ड्रग्जचा गैर व्यवहार वाढण्या मागचे एक कारण म्हणजे दर वर्षी वर्षाच्या शेवटीला होणाऱया पाटर्य़ा आहेत. यावर्षी आयोजित केलेली सनबर्न पार्टी ही बेकायदेशीर असून तीन युवकांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सनबर्न आयोजकांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.
गोमंतकीयांचा विरोध असताना बेकायदेशीर रित्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कोणतेही सोपस्कर पूर्ण करण्यात आले नव्हते. वास्तविक कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करायचे असल्यास त्यासाठी योग्य सोपस्कर पूर्ण करणे जरुरीचे असते. संबंधीत अधिकाऱयांकडून कार्यक्रम आयोजनासाठी नाहरकत दाखला घेणे जरुरीचे असते. पार्टी आयोजकांनी ध्वनीसाठी उपजिल्हाधिकाऱयांचा नाहरकत दाखला न घेताच 27 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून पार्टीला सुरुवात केली होती असेही निवेदनात म्हटले आहे. एकूणच सनबर्न पार्टीचे बेकायदेशीररित्या आयोजन करण्यात आले होते म्हणूनच आयोजकांविरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.