अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 19 सप्टें. 2021, स. 11.30
● रविवारी अहवालात 275 बाधित ● एकूण 11,398 जणांची तपासणी ● मृत्युदर घटल्याचा मोठा दिलासा ● जिल्ह्यात अनंत चतुर्दशीचा उत्साह ● स्थिती आटोक्यात पण संपली नाही ● 23 लाख 25 हजार जणांचे लसीकरण
सातारा / प्रतिनिधी :
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर गेल्या दोन महिन्यापासून मंदावत चाललेला आहे. सप्टेंबर महिन्याच्या आरंभापासून जिल्ह्याला वेग मंदावत असल्याचा मोठा दिलासा लाभला असला तरी तो अद्याप थांबलेला नाही. गत दहा दिवसांपासून बाधित वाढ 200 ते 300 च्या संख्येवर स्थिर असून, यामध्ये मृत्युदर घटल्याने भीतीचे वातावरण कमी झाले आहे. गणेश उत्सवात गणरायाच्या चरणी ‘हे कोरोनाचे संकट लवकर टळू दे’ असे साकडे सर्वजण घालत होते. त्याची परिणिती कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यात झाली अशीच सर्व गणेश भक्तांची भावना आहे.
रविवारी अहवालात 275 बाधित
गत दोन-तीन दिवसात बाधित वाढ 231, 252, 203, 315 आणि रविवारच्या अहवालात 275 अशी राहिलेली आहे. सप्टेंबरच्या मध्यावर 200-तीनशेच्या संख्येवर स्थिर असून, रविवारी अहवालानुसार 11,398 जणांचे नमुने तपासण्यात आल्यानंतर 275 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर खली घसरलेला असून गणेश उत्सवात थोडीफार गर्दी होऊन देखील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने जिल्हावासियांनी जरा सुटकेचा निश्वास टाकलेला आहे.
23 लाख 25 हजार जणांचे लसीकरण
जिल्ह्याला शासनाकडून मोठ्या प्रमाणावर लसीचे डोस मिळाल्यामुळे लसीकरणाची गती वाढलेली असून आजपर्यंत जिल्ह्यातील 23 लाख 25 हजार 261 नागरिकांनी लस घेतलेली आहे. यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 16 लाख 73 हजार 813 एवढी दिलासादायक झालेली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सहा लाख 51 हजार 488 एवढी झालेली आहे. दरम्यान आज अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सकाळी अकरापर्यंत फक्त 136 जणांनी लस घेतल्याची नोंद कोविन पोर्टलवर झालेली आहे.
तिसऱ्या लाटेची शक्यता कमी
सातारा जिल्हा अद्याप दुसऱ्याला लाटेशी झुंजत असून यामध्ये राज्यभरातील देशभरातील एकूण या संदर्भातील वृत्तांचा ट्रेंड पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. कारण देशभरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण, 80 टक्के लोकांची मध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज व नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्यास संदर्भात आलेले भान यामुळे ही लाट आली तरी तितकीशी घातक ठरणार नाही. असे मत तज्ञांकडून मानले जात आहे. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने श्री गणेश देवाला निरोप देताना देखील हे ‘कोरोनाचे संकट लवकरच संपून जाऊ दे, असेच सर्व जिल्हा वासियांची निश्चितपणे भावना आहे. अशीच प्रार्थना करत जिल्हाभरात आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणेश विसर्जन नियम पाळत व साधेपणाने सुरू आहे.
शनिवारी जिल्ह्यात बाधित – 308, मुक्त – 526, मृत – 1
शनिवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने –19,79,304, एकूण बाधित –2,45,993, एकूण कोरोनामुक्त – 2,35,823, मृत्यू –6,034, उपचारार्थ रुग्ण–7,098