बलियात केशवप्रसाद मौर्य यांची टिप्पणी
समाजवादी पक्ष 10 मार्चनंतर समाप्तवादी पक्ष ठरणार आहे. यापूर्वी समाजवादी पक्षाचे सरकार राज्याच्या जनतेने अनुभवले आहे. तर भाजपने मागील 5 वर्षांपासून राज्याच्या जनतेची पूर्ण प्रामाणिकतेसह सेवा केली असल्याचे उद्गार उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी काढले आहेत. बलिया येथील भाजप उमेदवार आनंद स्वरुप शुक्ल यांच्या समर्थनार्थ त्यांनी प्रचारसभेला संबोधित केले आहे.
अखिलेश यादव स्वतःचा करहल मतदारसंघ वाचवू शकणार नाहीत, राज्यात सपची लुटारू नौका बुडाली आहे. भाजप सरकारकडून गरीब जनतेला मोफत धान्य देण्यात येत आहे. सप सरकार असते तर गरीबांचे धान्य त्यांच्याच नेत्यांनी लाटले असते. अखिलेश यादव यांनी कोरोनावरील लस घेणार नसल्याचे म्हटले होते. 3 मार्च रोजी कमळाच्या फुलावरील बटन दाबा, जेणेकरून कोरोनाची लस त्यांना टोचावी असे उद्गार मौर्य यांनी काढले आहेत.
सभेत उपस्थित मौर्य समाजाला संबोधित करताना उपमुख्यमंत्र्यांनी तुम्ही सर्वजण माझ्या परिवाराचे आहेत, येथे भाजपला विजयी करण्याची जबाबदारी तुम्हाला सोपवतोय असे म्हटले आहे. या सभेला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही संबोधित केले आहे. मतदानापूर्वी लोकांनी अयोध्या, काशी, मथुरेचे स्मरण करावे, कुठल्या सरकारने या श्रद्धेच्या केंद्रांचा विकास केला हे आठवून पहावे. महाराणा प्रताप यांच्या ध्वजाचा रंग भगवा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचा रंग भगवा होता. आम्ही देखील भगवाधारी आहोत असे ठाकूर म्हणाले.