सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
भवतालाचे प्रश्न समजून घेऊनच कवीला लेखन करावे लागते. कवी सफरअली इसप हे आज देशपातळीवर मांडले जाणारे प्रश्न आपल्या कवितेतून मांडत असल्यामुळे त्यांची कविता खऱ्या अर्थाने आजच्या काळाची कविता आहे. सफरअली हे आपल्यासमोर कोणता भयानक काळ उभा आहे याची जाणीव आपल्या कवितेतून तीव्रतेने करून देतात. म्हणूनच आवानओल प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेला त्यांचा हा गौरव सोहळा उचित असा त्यांचा सन्मान आहे असे प्रतिपादन नामवंत कवी–समीक्षक प्रा. डॉ.गोविंद काजरेकर यांनी तिथवली येथे केले.
दिव्यांग कवी सफरअली इसफ यांचा गौरव आवानओल प्रतिष्ठान कणकवलीतर्फे त्यांच्या तिथवली (वैभववाडी) या गावी प्रा. डॉ. काजरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तिथवली बाल गोपाळ मंडळ सभागृहात सामाजिक कार्यकर्ते नासिर काझी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिंधुदुर्ग विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाला आवानओल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय कांडर, कार्यवाह विनायक सापळे, इतर पदाधिकारी ॲड. विलास परब, अच्युत देसाई, किशोर कदम, सत्यवान साटम,कवी प्रा.नामदेव गवळी, प्रा. संजीवनी पाटील, सरपंच सुरेश हरयान, उपसरपंच अशोक आयरे, पं.स सदस्य हर्षदा हरयान, माजी सभापती बाळ हरयान, सोसायटी चेअरमन ब्रम्हानंद हरयान, ग्रामसेवक प्रशांत जाधव, पोलीस पाटोल गणेश हरयान आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नासिर काझी म्हणाले, तिथवली सारख्या ग्रामीण भागात राहून शरीराची साथ नसतानाही सफर हे कविता लिहीत आहेत. आणि त्यांची ही गुणवत्ता लक्षात घेऊन कणकवली सारख्या दूरची आवानओल प्रतिष्ठान सारखी साहित्य चळवळ सफर यांच्या गावी येऊन त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करते,यातूनच त्यांची काव्य गुणवत्ता स्पष्ट होत आहे. आज आवानओलच्या या कार्यक्रमामुळे सफर यांची काव्य गुणवत्ता वैभववाडी तालुक्यातील सर्व ग्रामीण भागाला कळली आहे. याबद्दल आवानओल प्रतिष्ठानला मी धन्यवाद देतो असे मत व्यक्त केले.
मातोंडकर म्हणाले, सफरअली शरीराने सुदृढ नसले तरी मनाने सुदृढ आहेत. ते सामान्य माणसापेक्षा खूप वेगळा विचार करतात. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने आजच्या काळाची कविता लिहीत आहेत. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याचा वाचक म्हणून आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. हा त्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या त्या प्रश्नांचा गौरव असल्याचे मत व्यक्त केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांडर म्हणाले, मराठी साहित्यात ज्यांचं नाव कवी म्हणून मोठे आहे असे अनेक कवी सफरअली इसफ ज्या उंचीवर कवितेचा विचार करतात तसा विचार करत नाहीत. सफरअली यांना कविता मनोरंजनासाठी लिहायची नाहीय तर समाजात जो भेद निर्माण केला जातोय त्या प्रवृत्तीवरच प्रहार करायचा आहे. ही त्यांची समज इतर कवींना आदर्शवत आहे. त्यांची कविता योग्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आवानओल चळवळीची असेल असे म्हणाले.
यावेळी सफरअली यांनी आपल्या सत्काराला उत्तर दिले. श्री सारंग यांनी सफरअली यांच्यावर लिहिलेली हिंदी कविता सादर केली. सूत्रसंचालन ॲड. विलास परब यांनी तर स्वागत अच्युत देसाई, किशोर कदम, सत्यवान साटम यांनी केले. विनायक सापळे यांनी आभार मानले.