प्रतिनिधी /पणजी
सभापती राजेश पाटणेकर यांनी डिचोलीतून निवडणूक लढविण्यास भाजपला नकार दर्शविला असला तरी त्यामागील खरी कारणे वेगळीच आहेत. मुळात भाजपच्या नेत्यांनी राजेश पाटणेकर यांची चारही दिशांनी कोंडी केली होती. त्यातून ते प्रचंड नाराज झाले होते. त्यातच कोविडबाधित झाल्याने त्यातून आलेल्या नैराश्य भावनेतून त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दर्शविला आहे.
प्राप्त माहितीनुसार सभापती राजेश पाटणेकर यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ नये. यासाठी पक्षांतर्गत तिघा मोठय़ा नेत्यांचा डाव होता. तथापि सभापती या नात्याने राजेश पाटणेकर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या 10 व मगोतून भाजपमध्ये गेलेल्या 2 मिळून बाराही आमदार अपात्र ठरत असताना देखील पाटणेकर यांनी त्यांना व त्याचबरोबर सरकारलादेखील वाचविले होते. त्याबदल्यात त्यांना डिचोलीची उमेदवारी पुन्हा देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानंतर पाटणेकर यांना बाद करण्यासाठी तिघा नेत्यांनी हरतऱहेने प्रयत्न केले.
एका नेत्याने डिचोलीत शिल्पा नाईक यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केला. दुसऱया नेत्याने डॉ. चंद्रकात शेटय़े याच्या नावाचा प्रयत्न केला, तर तिसऱया नेत्याने मगोचे नरेश सावळ यांच्यासाठी आग्रह धरला. डॉ. शेटय़े यांच्या नावास तिघांपैकी एका नेत्याने प्रखर विरोध केला. असे असतानादेखील भाजपचे गोव्यातील दोन वरिष्ठ नेते डॉ. शेटय़े यांच्या घरी जाऊन बसले. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करू शकत नाही, आपण अपक्षच लढविणार, असे सांगितले. गंमत म्हणजे ज्या नेत्याने शिल्पा नाईक यांनाच उमेदवारी मिळावी, असा आग्रह धरला त्या नेत्याने शेटय़े यांना विरोध दर्शविला. त्यानंतर उर्वरित दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी शिल्पा नाईक यांच्या नावाला विरोध दर्शविला. शेवटी तिघामध्ये मतैक्य होईना म्हणून दोन वरिष्ठ नेते थेट नरेश सावळ यांच्या घरी गेले व त्यांच्याकडे आग्रह धरला. त्यांनी देखील यावेळी आपण पक्ष सोडू शकत नाही, असे सांगून त्याला परतवून लावले.
या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्र्यांच्या पसंतीचा उमेदवार म्हणून डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांना डॉ. सांवत यांनी गळ घातली. त्यांना गेल्याच महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सभापतींना विचारात व विश्वासात न घेताच हे सारे प्रयोग तिन्ही नेत्यांनी सुरू केले. अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी आपण प्रयत्न केल्यानंतर देखील आपल्याशी हे नेते असे का वागले! याचा सभापती पाटणेकर यांना पश्चाताप झाला. नरेश सावळ यांच्या कॉलेजला परवानगी तसेच त्यांना देखील सरकारी कर्मचारी भरतीमध्ये त्यांच्या माणसांना सहभागी करून घेतले. राजेश पाटणेकर यांनी सूचविलेल्या कोणालाही नोकरी देण्यात आली नाही.
खुद्द मत्र्यांने सांगितले होते अपात्र करा म्हणून
सरकारची चावी पाटणेकर यांच्या हातात हेती. सर्वांना अपात्र करा, अशा सूचना अनेक नेत्यांनी पाटणेकर यांना केली होती. त्यातल्या त्यात मुख्यमंत्रिपदावर डोळा ठेवून असलेल्या एका मंत्र्याने तर वारंवार फोन करून सर्वांना अपात्र कराच असा आग्रहदेखील धरला होता. अनेक नेत्यांचा दाबाव असूनदेखील पाटणेकर यांनी कोणालाही अपात्र केले नाही. त्यातून मुख्यमंत्र्यांचे आसन वाचले व भाजपवरची नामुष्की टळली, असे असूनदेखील पाटणेकर यांनी उमेदवारी देण्यास टाळाटाळ केलीच.