प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील समडोळी येथे गावात पाईपलाईनसाठी आणलेल्या प्लास्टिकच्या पाईपना भीषण आग लागली. सुमारे तीन ट्रक पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून झाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत माहिती मिळू शकली नाही.
समडोळी गावात सध्या पाण्याच्या पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी येथे तीन ट्रक पाईप आणून ठेवण्यात आल्या होत्या. सध्या दिवाळी निमित्त कामगारांना सुट्टी असल्याने काम बंद आहे. अचानक पाईप मधून धूर आला. बघता बघता पाईपच्या एका बंडलला आग लागली. सर्व पाईप प्लास्टिकच्या असल्याने काही क्षणातच आगीने रुद्ररूप धारण केले. संपूर्ण गावात धुराचे लोट पसरले. या आगीत सर्वच्या सर्व पाईप जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवांनानी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ही आग कशामुळे लागली, याची माहिती मिळू शकली नाही.