माहिती देण्यास सर्व विभागाच्या अधिकाऱयांची टाळाटाळ
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट व अन्य खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने याचा फटका कॅन्टोन्मेंट व शहरातील नागरिकांना बसत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी कॅन्टोन्मेंट कार्यालयात बंद दरवाजाआड बैठक पार पडली. या बैठकीत कोणते निर्णय झाले, ही बाब गुलदस्त्यात आहे. सरकारनियुक्त सदस्यांना अंधारात ठेवून बैठक घेण्यात आली. त्यामुळे या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
जिल्हा प्रशासन व कॅन्टोन्मेंट अधिकाऱयांची बैठक बुधवारी पार पडली. मात्र या बैठकीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली नाही. बैठकीची माहिती प्रसार माध्यमांना मिळू नये, यादृष्टिकोनातून सकाळी 8.30 वाजता बैठक आयोजिली होती. कॅन्टोन्मेंट अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, महापालिका आयुक्त, एलऍण्डटी कंपनीचे व्यवस्थापक, स्मार्ट सिटीचे कार्यकारी व्यवस्थापक, कॅन्टोन्मेंटचे मुख्यकारी अधिकारी व अन्य अधिकाऱयांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही बैठक घेतली. मात्र या बैठकीची माहिती सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुप्पेकर यांनाही दिली नाही. सरकारनियुक्त सदस्यांना अंधार ठेवून बैठक घेण्यात आल्याने तुप्पेकर बैठकीला उपस्थित नव्हते. बंद दरवाजाआड झालेल्या बैठकीत कोणती चर्चा झाली, याची माहिती देण्यास कॅन्टोन्मेंटसह सर्वच विभागाच्या अधिकाऱयांनी टाळाटाळ केली. त्यामुळे बैठकीतील चर्चेची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
कॅन्टोन्मेंटला परवानगीचा अधिकार नाही…
पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे ही माहिती जिल्हाधिकाऱयांना देण्यात आली. तसेच पाणीबिलाची रक्कम भरण्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रयत्नशील असून निधी मंजूर करून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. निधी मिळाल्यानंतर बिलाची रक्कम भरण्यात येईल. पण पाणीपुरवठा बंद करून नागरिकांची गैरसोय करण्यात येवू नये, अशी विनंती कॅन्टोन्मेंटच्यावतीने करण्यात आली. त्यामुळे बिलासाठी पाणीपुरवठा बंद करू नका, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महापालिका आयुक्त आणि एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांना केल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांनी दिली. तसेच 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत लक्ष्मी टेकडीपासून कॅन्टोन्मेंट परिसरात जलवाहिन्या घालण्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार कॅन्टोन्मेंटला नाही. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाच्या पोर्टवर रितसर अर्ज करून परवानगी घेण्याची माहिती जिल्हाधिकारी आणि एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांना कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.