नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व ह्या तीन वेगवेगळय़ा संकल्पना आहेत. परंतु, श्रीसमर्थांनी मानवसमाजाला श्रीमददासबोध रूपी जे अमृत भेट दिले आहे, त्यात ह्या तीनही संकल्पनांचा जेथे संगम होतो तेथेच समर्थ नेतृत्व उदयास येते.
अनेकवेळा काही नेतृत्व करणाऱया मंडळींकडे उत्तम वक्तृत्व असते, पण म्हणावे तेवढे कर्तृत्व नसल्याने ते समर्थ नेतृत्व होऊ शकत नाही. तर, काही नेतृत्व करणारी मंडळी खूप कर्तृत्ववान असतात, पण त्यांच्यात वक्तृत्व गुण नसल्याने ते फार काळ यशस्वी होऊ शकत नाहीत. छ. शिवाजी महाराजांकडे नेतृत्वासाहितच वक्तृत्व आणि कर्तृत्व देखील होते. छ. शिवाजी महाराजांच्या काळात छ. शिवाजी महाराजांनी केलेल्या पत्रव्यवहारात त्यांचे दूरदर्शीत्व आणि वक्तृत्व जाणवते. तसेच छ. शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्यस्थापनेमुळे त्यांचे अलौकिक कर्तृत्व जाणवते. ह्यामुळेच त्यांचे अद्वितीय असे समर्थ नेतृत्व भारतीय समाजाला कायमस्वरूपी मार्गदर्शन करणारे आहे.
श्री समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन
“शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।। ’’
यथार्थ शब्दांत केले आहे.
आपल्या भारत देशांत भक्ती ही खूप मोठी शक्ती आहे. ह्या शक्तीच्याच आधारे आपल्यावर अनेक वेळा परकीय आक्रमण होऊन सुद्धा आपण स्वतःची संस्कृती, स्वतःचा धर्म टिकवून ठेऊ शकलो आहोत. आपल्या भारतीयांचे प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे आदर्श आहेत. प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण ह्यांच्यानंतर जर आपल्या देशवासियांना सामर्थ्यशाली, न्यायी, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष असे मिळालेले समर्थ नेतृत्व म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असलेले सर्व उत्तम गुण हे आपल्याला श्री समर्थांच्या श्रीमददासबोध ग्रंथात पहायला मिळतात.
श्री समर्थ उत्तमगुण लक्षण समासात असे म्हणतात की,
“ सत्यमार्ग सांडू नये ।
असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये ।
असत्याचा ।।
अपकीर्ती तें सांडावी ।
सत्कीर्ति ते वाढवावी ।
विवेकें दृढ धरावी ।
वाट सत्याची ।। 02/02/40-41’’
ह्याचा अर्थ असा आहे की,
सन्मार्ग कधीही सोडू नये. असत्याचा मार्ग अवलंबू नये. कधीही अभिमान असत्याच्या मार्गाचा करू नये. अपकीर्ती होऊ देऊ नये, सत्कीर्ती वाढेल असेच वर्तन असावे. विवेकाने सत्याची वाट धरावी.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात वरील सर्व उत्तम गुण जाणवतात.
श्री समर्थांनी श्रीमददासबोध ग्रंथात चातुर्यविवरण समास सांगितला आहे. श्री समर्थ असे म्हणतात की,
“ मिळोन जाऊन मेळवावें ।
पडी घेऊन उलथावें ।
काहीच कळों नेदावें ।
विवेकबळें ।।
दुसऱयाचे चालणीं चालवावें ।
दुसऱयाचे बोलणीं बोलवावें ।
दुसऱयाचे मनोगतें जावें ।
मिळोनियां ।। 15/05/26-17’’
ह्याचा अर्थ असा आहे की,
समाजात मिळून मिसळून वागावे. समाजाच्या हितासाठी वेळीच विवेकाने बाजी उलटवावी. दुसऱयासारखे चालावे, दुसऱयासारखे बोलावे, मिळून-मिसळून दुसऱयाचे मनोगत ओळखावे.
श्रीसमर्थांनी सांगितलेली ही सर्व लक्षणे छ. शिवाजी महाराजांच्या समर्थ नेतृत्वात होती. अफजलखान वधावेळी छ. शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या चातुर्यामुळेच विजय प्राप्त झाला. तसेच सुरतेची लूट आणि आग्रा येथील यशस्वी सुटका ही छ. शिवाजी महाराजांच्या चातुर्यामुळेच घडून आले.
छ. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे त्या काळातील सुप्तावस्थेत असलेला भारतीयांच्या मनांतील राष्ट्रवाद जागा झाला आणि परकीयांच्या जाचातून मुक्त होण्याची प्रबळ इच्छाशक्ती भारतीय जनमानसात निर्माण झाली.
छ. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच पुढे बुंदेलखंडचा राजकुमार छत्रसाल ह्याने बुंदेलखंड स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष केला. छ. शिवाजी महाराजांनंतर अटकेपार झेंडा मराठा साम्राज्याने फडकवला. त्याच्या मुळाशी छ. शिवाजी महाराजांचीच प्रेरणा होती.
पुढे इंग्रजांच्या जुलमी राजवटीत भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी संघर्ष केला त्यांचे प्रेरणास्रोत हे छ. शिवाजी महाराजच होते. स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वा. सावरकर ह्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या शौर्य, कल्पकता, राजधर्मपालन आणि संघटन ह्या गुणांना आत्मसात करून भारतीय स्वातंत्र्य लढय़ात स्वतःचे अनमोल योगदान दिले. राष्ट्राच्या कल्याणासाठी शिवसमर्थ नेतृत्व ह्या सर्व महापुरुषांनी आचरणात आणले.
सर्व वाचकांना छ. शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा !
माधव श्रीकांत किल्लेदार