ऑनलाईन टीम / सातारा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य औरंगाबादेतील एका कार्यक्रमात केलं आहे. त्यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनीही ट्विटव्दारे राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
उदयनराजेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खऱ्या गुरू होत्या. रामदास हे कधीही शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. हाच खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केला. त्यामुळं शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवं होतं. कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरित मागं घ्यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला आहे.