प्रतिनिधी / बेळगाव
समर्थ सोसायटीचा मी आज जरी चेअरमन असलो तरीही गेल्या 24 वर्षांत अनेकांनी ही संस्था उभारण्यासाठी जे सहकार्य केले आहे. अशा अनेक सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्जदार आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळेच श्री समर्थ सोसायटीने प्रगतीची घोडदौड चालू ठेवली आहे, असे विचार समर्थ सोसायटीचे चेअरमन एन. डी. जोशी यांनी बोलताना व्यक्त केले. श्री समर्थ अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीला चोवीस वर्षे पूर्ण झाली असून बुधवार दि. 25 नोव्हेंबर रोजी सोसायटीने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले त्याप्रसंगी एन. डी. जोशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, अल्पशा भांडवलावर सुरू झालेल्या या सोसायटीने 125 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून 106 कोटी रुपयांची कर्जे वितरित केली आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल 500 कोटी रुपयांवर असून संस्थेच्या मारुती गल्लीतील मुख्य शाखेसह राणी चन्नम्मानगर, सोमवार पेठ टिळकवाडी आणि बिच्चू गल्ली शहापूर अशा एकूण चार शाखा कार्यरत आहेत. लवकरच खानापूर शहरात शाखा सुरू करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
विशेष ठेव योजनेला उत्तम प्रतिसाद
या सोसायटीने 25 व्या वर्षानिमित्त विशेष ठेव योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत 25 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2020 या कालावधात 25 महिन्यांसाठी ठेवल्या जाणाऱया ठेवीवर 11.5 टक्के व्याज दिले जाणार आहे. पहिल्या दिवशीच या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला असेही जोशी यांनी सांगितले. वर्धापन दिनानिमित्त समर्थांच्या पूजेचे आयोजन केले होते.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सुहास कुलकर्णी, संचालक न्यायवादी अजय सुनाळकर, गणपत कुलकर्णी, विनायक जोशी, विनय कुलकर्णी, प्रदीपकुमार कुलकर्णी, सुनंदा आळेतकर, छाया एन. जोशी, अनिल भंडारी, परशुराम कांबळे, उमेश सुणगार, अशोक पुजारी तसेच सेक्रेटरी अरविंद कुलकर्णी आणि जनरल मॅनेजर राघवेंद्र केसनूर उपस्थित होते.
कोरोनामुळे सध्या कार्यक्रम रद्द करण्यात आला असून पुढील वर्षभरात ठेवी व कर्जदारांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहितीही जोशी यांनी यावेळी दिली. दिवसभरात अनेक हितचिंतकांनी भेटून शुभेच्छा दिल्या.