मुख्यमंत्र्यांकडूनही दुजोरा : मगोशी युती भाजपने तोडली नाही, चूक मगोचीच.देवी शांतादुर्गेची अराष्ट्रीय महिलेशी तुलना दुर्दैवी
प्रतिनिधी /डिचोली
भाजपने राज्यात आणि देशात सदैव राज्य व राष्ट्र प्रथम या विचारांनी आणि तत्वानुसार राजकारण केले आहे. गेली दहा वर्षे गोव्यात भाजप सत्तेवर आहे. भाजपने केवळ राष्ट्र आणि राज्याचे हित जपण्याचेच प्रयत्न केले असून याहीपुढे या राज्यात चांगल्या आणि राज्य, राष्ट्रीय विचारांच्या पक्षांचेच राज्य यावे अशीच गोवेकर लोकांची अपेक्षा आहे. हल्लीच पक्षाचे राष्ट्रीय नेते अमित शाह राज्यात येऊन गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी हा विचार व्यक्त केला आहे. आज जर याच विचारसरणीचे पक्ष युतीस इच्छुक असल्यास गोव्यात त्यांच्यासोबत भाजप जूळवून घेण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सध्या या शांत आणि सदैव धार्मिक सलोखा राखणाऱया गोवा राज्यात अराष्ट्रीय शक्ती पाय पसरत असून अशा शक्तींना राज्यातील लोकच थारा देणार नाहीत. त्यांना कशा प्रकारे आळा घालावा, यावर लोकच विचार करीत असून भाजप पक्ष राष्ट्र आणि राज्य प्रथम या तत्वांचा अवलंब करणाऱया पक्षांना घेऊन पुढे जाण्यास तयार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले.
युती कोणाशी हे पक्षश्रेष्ठ ठरविणार!
राज्यात पक्षश्रेष्ठनी समविचारी पक्षांशी युती करण्याचा विचार राज्यातील राजकारणात समोर ठेवला आहे. आता सदर युती कोणाबरोबर करावी आणि नाही हे केंद्रातील पक्षश्रेष्ठ ठरवणार. आम्ही केवळ पक्षाचे काम करीत असून राज्यातील लोकांचे हित जपण्याचे कार्य केले आहे. याच धर्तीवर जर राज्यातील समविचारी पक्ष भाजपशी एकनिष्ठ होणार असल्यास आमची दारे उघडी आहे, असेही ते पुढे म्हणाले.
युती तुटण्याची सुरुवात मगोकडूनच !
राज्यात भाजपबरोबर सरकारात असलेल्या मगो पक्षाने केलेल्या एका चुकीमुळेच मगो आणि भाजपची युती तुटली होती. कारण मगो पक्षाने सरकारात असतानाही शिरोडा मतदारसंघात आमच्या उमेदवाराविरोधात आपला उमेदवार उभा केला होता. त्यांना आम्ही अनेकवेळा उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली, परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर त्यांचे दोन आमदार आमच्या पक्षात आले, त्यांचे आम्ही स्वागत केले. युती तुटण्याची सुरुवात मगो पक्षानेच केली. आज जर आमच्या पक्षाच्या विचारसरणीशी जुळून जर हा पक्ष येण्यास इच्छुक असल्यास आम्हीही तयार आहोत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
शांतादुर्गा देवीशी अराष्ट्रीय विचारांच्या महिलेची तुलना दुर्दैवी
देवी शांतादुर्गा ही या राज्याचे आराध्य दैवत आहे. शांतादुर्गा देवीला आम्ही पूजतो. ती शांत आणि या राज्यातील धार्मिक सलोखा राखून आहे. मात्र या देवीची तुलना एका अशा महिलेशी, ज्यांच्या राज्यात महिला, भगिनींवर राजरोसपणे अत्याचार अन्याय होतात. निवडणुकीनंतर या त्यांच्या राज्यात घडलेली अराजकता संपूर्ण देशाने आणि या राज्यानेही पाहिली आहे. या महिलेशी आमच्या शांतादुर्गा देवीची तुलना गोव्यातील कोणीही मान्य करूच शकत नाही. आमदार विजय सरदेसाई यांनी अशा नेत्यांना आवरणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.