प्रतिनिधी / बेळगाव :
समाजात जे निराश्रीत, वंचित, दुर्लक्षित आहेत अशा सर्वांना आश्रय देण्याचे समाजकार्य सर्वांनाच जमते असे नाही. परंतु असे समाजकार्य करणाऱयांना पाठिंबा देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. शांताई वृद्धाश्रमाने वृद्धांना जणू दुसरे बालपणच बहाल केले आहे. त्यामुळे येथे असणाऱया सर्वांचे आर्युमान निश्चित वाढणार आहे, असे मत खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी क्यक्त केले.
बामनवाडी येथील शांताई वृद्धाश्रमात कै. शकुताई परांजपे सभागृह, भरमा पाटील व्यासपीठ आणि अन्नधान्य कोठार यांचा उद्घाटन समारंभ गुरुवारी सकाळी 11 वा. झाला. याप्रसंगी उद्घाटक या नात्याने डॉ. कोरे बोलत होते. व्यासपीठावर सांबरा एअरपोर्टचे संचालक राजेशकुमार मौर्य, एसीपी एन. व्ही. बरमनी, शांताईचे अध्यक्ष विजय पाटील, त्यांच्या मातोश्री शांताई, मंगल केतकर, नागेश चौगुले व विजय मोरे उपस्थित होते.
राजेशकुमार मौर्य यांनी शकुताई परांजपे यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे सूत्र समोर ठेऊन वाटचाल केली. ज्यांना समाजाने झिडकारले त्यांना शकुताईनी आपलेसे केले. हा सेवाभाव दुर्मीळ झाला असून तो आपण सर्वांनी जपला पाहिजे, असे सांगितले.
एन. व्ही. बरमनी यांनी एकत्रित कुटुंब ही आपली संस्कृती होती. परंतु ज्यांना हे सुख लाभत नाही, त्यांच्यासाठी कुटुंबाप्रमाणेच शांताई वृद्धाश्रम साहाय्यभूत ठरतो आहे, असे सांगितले.
प्रारंभी अफसाना, सुश्मिता व दिव्यश्री यांनी स्वागतगीत सादर केले. विजय मोरे, नागेश चौगुले, विजय पाटील यांनी अनुक्रमे प्रभाकर कोरे, राजेशकुमार मौर्य व एन. व्ही. बरमनी यांचा सत्कार केला. शांताई यांच्या हस्ते मंगल केतकर, नीता दिवेकर, शोभा मजली यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशांत दिवेकर यांनी शकुताई यांनी लोकांना प्रेम द्या, शिकण्याची संधी द्या, समाजाचे ऋण फेडा आणि जे काम करतात त्यांना पाठिंबा द्या, या सूत्राने जीवनभर वाटचाल केली. स्वप्ने पाहण्याची आणि ती साकारण्याची त्यांची जिद्द मोठी होती, असे सांगितले.
यावेळी शांताईला साहाय्य करणारे मेहता, वेसणे, अशोक आयर्न, केणी, भरमा पाटील, तसेच रेखा बाळेकुंद्री, सुयश खानोलकर, विनायक, राजू, मनोज, चंद्रकांत व चंद्रू गोकाक, गजानन घाडी, केशव पुजारी, प्रवीण हिरेमठ, गंगाधर व सहकारी या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्ता कामकर यांनी, शकुताईंच्या घरी मी राहिलो होतो. माझ्या शिक्षणाचा खर्च त्यांनी केला. त्यांच्यामुळेच आज मी प्राध्यापक होऊ शकलो. स्वत:साठी त्यांनी कोणत्याच अपेक्षा ठेवल्या नाहीत. या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. रजनीताई देशपांडे यांनी आश्रमातील आठवणींना उजाळा देऊन एकविसाव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. रोहितराज यांनी शांताईच्या 21 वर्षाच्या वाटचालीचा थोडक्मयात आढावा घेतला. यावेळी निरंजना अष्टेकर व सविता मेहता यांचा शांताई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन विनीत वाझ व सँड्रा सायमन यांनी केले. वसंत बालिगा यांनी आभार मानले. यावेळी शांताईचे अध्यक्ष विजय पाटील, त्यांच्या मातोश्री शांताई, मंगल केतकर, नागेश चौगुले व विजय मोरे उपस्थित होते.
प्रभाकर कोरे यांच्याकडून एक लाखाची देणगी
हा वृद्धाश्रम वृद्धांकडून कोणतेही शुल्क घेत नाही. अर्थातच त्याचा खर्च मोठा आहे, असे सांगून प्रभाकर कोरे यांनी बँकेतर्फे एक लाख रुपयांची देणगी दिली. तसेच पत्नीला विचारून आणखी एक लाख रुपये देऊ, असे त्यांनी सांगताच उपस्थितांत हास्याची लकेर उमटली.