अखिलेश यादव यांचा दावा
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीतील सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 403 जागा आहेत. या 403 जागांपैकी 400 हून अधिक जागा आपल्या समाजवादी पक्षाला आणि त्याच्या मित्रपक्षांना मिळतील असा दावा या पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी हा दावा केला.
भाजपच्या सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. परिणामी, उत्तर प्रदेशातील जनता भाजपवर अतिशय नाराज आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष आणि त्याने केलेल्या छोटय़ा पक्षांसोबतच्या युतीला राज्यात सर्वत्र अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आम्ही 403 पैकी 400 च्या वर जागा जिंकू असे प्रतिपादन त्यांनी या मुलाखतीत केले. शेतकरी, कामगार, उद्योजक, महिला, विद्यार्थी, युवक, अल्पसंख्य, दलित मागासवर्गिय आदी सर्व समाजघटक भाजपविरोधात आहेत. ते संधीची वाट पहात आहेत, असा दावा त्यांनी केला.
भाजपच्या आमदारांना आणि खासदारांना लोक जाहीररित्या मारहाण करीत आहेत. ही केवळ सुरवात आहे. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येईल, तशी लोकांची राज्य सरकारविरोधातील नाराजी अधिकच वाढणार असून राज्यात सत्ताबदल अटळ आहे, अशी मांडणी अखिलेश यादव यांनी केली.