आमदार सोपटे यांची अशोक नाईक यांना विनंती
प्रतिनिधी /पणजी
भंडारी सामाजाचे अध्यक्ष म्हणून प्रसार माध्यमासमोर बोलताना अध्यक्ष अशोक नाईक यांनी सामाजातील ज्ञातीबांधवांचा विचार करून बोलावे अशी विनंती मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी केली आहे. समाजातील ज्ञातीबांधव विविध राजकीय पक्षाशी निगडीत आहेत. 106 वर्षानंतर एका मुख्यमंत्र्यांनी भंडारी समाजाच्या कार्यालयाला भेट दिली आहे हे विधानही चुकीचे आहे. रवी नाईक मुख्यमंत्री असताना अनेकवेळा भंडारी समाजाच्या कार्यालयात आले आहेत असेही सोपटे यांनी सांगितले.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दयानंद सोपटे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत आमदार मिलींद नाईक उपस्थित होते. समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही वेगळे भाग आहेत त्यात गोंधळ निर्माण करून ज्ञातीबांधवांना दुखवू नये असेही सोपटे म्हणाले. राज्यातील भंडारी समाज हा मोठा समाज आहे. विविध स्तरावरून समाजासाठी कार्य करीत आहेत. अनेक समाज बांधव विविध राजकीय पक्षाशी संबंधीत आहेत. काहीजण आपल्या पक्षाचे नेतेही आहेत. भंडारी समाजातील लोक स्वतःची प्रगती करीत असताना त्यांना दुखवून त्यांच्या वाटचालीत अडथळी निर्माण करू नका असेही सोपटे म्हणाले.
भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कार्यालयात बोलावून त्यांचा आधरसत्कार केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की जो पक्ष सर्वात जास्त उमेदवारी समाजातील बांधवाना देईल त्यांच्या मागे भंडारी समाज उभा रहाणार. तसेच 106 वर्षा नंतर प्रथमच एक मुख्यमंत्री भंडारी समाजाच्या कार्यालयात आलेचेही अशोक नाईक यांनी म्हटले होते. कुणालाही बोलावून त्याचा आधर सत्कार करणे गैर नाही मात्र समाजाला गृहीत धरून पत्रकारांसमोर विधान करताना विचारपूर्वक विधाने करावीत असेही सोपटे म्हणाले.
वास्तविक कुठलाही उमेदवार आपल्या कतृत्वावर निवडून येत असतो. कारण त्याला सर्वांची मते हवी असतात. आपण आमदार म्हणून पाच वेळा निवडून आलो आहे. माझ्या मतदार संघातील माझ्या समाजाच्या लोकांची कामे करीत असताना इतर समाजातील लोकांचीही आपण कामे केली आहेत. सरकारच्या अधिकाधिक योजना लोकांपर्यंत पोचतील त्यासाठी आपण कार्य केले आहे. म्हणूनच माझे मतदार मला निवडून देतात. आमचे ज्ञातीबांधव राज्यातील विविध मतदार संघात विखूरलेले आहेत. त्यामुळे केवळ भंडारी समाजाचा उमेदवार म्हणून निवडून येणे शक्य नसून त्यासाठी सर्व मतदारांची कामे करून त्यांच्याशी चांगले संबंध राखणे तितकेच जरूरीचे आहे असेही सोपटे म्हणाले.
अरवींद केजरीवाल गोव्यात येऊन लोकांना गाजर दाखवत आहेत. दिल्लीत सध्या काय परीस्थिती आहे ते सोशल मिडीयावरून आम्ही पाहत आहोत. दिल्लीत पाणी मिळत नाही आणि गोव्यातील लोकांना फुकट विज देण्याचे गोष्टी करीत आहेत. दिल्लीत किती लोकांना विज फुकट देतात आणि त्याची वसूली कुणाकडून केली जाते याची माहिती आम्हाला मिळत असते. असेही सोपटे म्हणाले. खर म्हणजे अरविंद केजरीवाल कोण हेही आपल्याला माहित नव्हते केवळ दिल्लीचा मुख्यमंत्री आपण त्यांना ओळखतो. गोव्यातील लोकांना आश्वासनाचे गाजर दाखविण्यापेक्षा दिल्लीतील लोकांना पीण्याचे पाणी उपलब्ध करून द्या असा टोमणाही सोपटे यांनी मारला. गोव्यातील लोक सुज्ञ आहेत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नका असेही सोपटे म्हणाले.