तरुण भारततर्फे ज्योतिष तज्ञांचा सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
कालविधान शास्त्राचा, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास जो करतो तो परमात्म्यालाही जाणतो, असे विचार वेदशास्त्रसंपन्न नागेशशास्त्राr हेर्लेकर यांनी व्यक्त केले. गुढीपाडवा हा दिवस ज्योतिष दिन म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्ताने तरुण भारततर्फे हेर्लेकर गुरुजी, आनंद मत्तीकोप, प्रा. तेजराज किंकर व गणेश शुक्ल या ज्योतिष तज्ञांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी हेर्लेकर गुरुजी बोलत होते.
ते म्हणाले, वेदांची मुख्य प्रवृत्ती ही अध्यात्माची आहे. वेदांमधील मंत्र हे यज्ञासाठीच तयार झाले आहेत. यज्ञाचा खरा अर्थ हा त्याग आहे. मनुष्याने त्याग कसा करावयाचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला जे मिळेल ते फक्त आपणच खायचे नाही तर इतरांना देऊन खायचे. त्या शिवाय त्याग पूर्ण होत नाही. यज्ञ किंवा कोणतेही कर्म कसे, कधी, कुठे करावे, हे जे शास्त्र सांगते ते ज्योतिष शास्त्र होय.
सामाजिक दृष्टिकोन ठेवून ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केल्यास अनेकांचे कल्याण होणार आहे. इतरांचे कल्याण करण्याची आपली प्रवृत्ती असल्यास आपलेही कल्याण निश्चितच होणार आहे. मात्र, या शास्त्राचा दुरुपयोग झाल्यास अधोगती सुरू होईल, असे मत्तीकोप म्हणाले.
प्रा. तेजराज किंकर यांनी आपली बलस्थाने, आपले दोष, संधी आणि भीती (थ्रेट्स) या चार सूत्रांवर व्यक्तीची चिकित्सा केली जाते. पंचांगाचा अभ्यास किंवा पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर याचे गणित मांडणे सोपे होते, असे सांगितले. शुक्ल यांनी ज्योतिष शास्त्राबद्दल समाजाला माहिती देऊन जनजागृती करण्याची गरज आहे. हे एक शास्त्र आहे, थोतांड नाही हे लक्षात घ्यायला हवे, असे ते म्हणाले. या चौघांचाही संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी हा उपक्रम स्वागतार्ह असल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. मनीषा सुभेदार यांनी स्वागत व प्रास्ताविक करून सर्वांचा परिचय करून दिला.