डॉ. बाबु जगजीवनराम यांची जयंती साजरी
प्रतिनिधी /बेळगाव
डॉ. बाबु जगजीवनराम यांनी समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज अनुसूचित जाती समाजाच्या नागरिकांना उच्च शिक्षण मिळत आहे. मोठी पदे मिळाली आहेत. मात्र आता या लोकांनीच समाजाच्या विकासासाठी पुढे येणे काळाची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी व्यक्त केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका व समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वरनगर येथील डॉ. बाबु जगजीवनराम उद्यानात हरितक्रांतीचे प्रणेते व भारताचे माजी उपपंतप्रधान डॉ. बाबु जगजीवनराम यांच्या 115 व्या जयंती कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी यांनी वरील मत व्यक्त केले आहे.
समाज कल्याण विभागच नाही तर जिल्हय़ातील सर्वच विभागांनी अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम केले पाहिजे. जेणे करून हा समाज उच्च शिक्षित होईल. यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आरसीयूतील राज्यशास्त्र विभागाचे साहाय्यक प्रा. डॉ. प्रकाश एस. कट्टीमनी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून संगमेश्वरनगर येथील डॉ. बाबु जगजीवनराम उद्यानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. समाज कल्याण विभागाच्या सहसंचालिका डॉ. उमा सालीगौडर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. समाज कल्याण विभागाचे अधीक्षक एम. बी. होसमनी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुदेश घाळी, महापालिकेचे उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, जिल्हा पंचायतीचे उपसचिव भीमाप्पा लाळी याचबरोबर मातंगी समाज, अनुसूचित जाती-जमातीचे नेते मल्लेश चौगुले, यल्लाप्पा हुदली, बाबु पुजारी यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.