नगरसेवक विष्णू माने, अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी योगदान शून्य
सांगली/प्रतिनिधी
विजयनगर येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यामुळे स्मारकाचे काम पूर्ण झाले. उलट बिरोबाच्या बनात धनगर समाज बांधवासमोर खोटी शप्पथ खाणार्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक दमडीचा निधी दिला नाही. त्यांचे योगदान शून्य आहे. समाजातील त्यांचे अस्तित्व संपले आहे. त्यामुळे स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी लोकार्पणाचा राजकीय फार्स करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे नगरेसवक विष्णू माने यांनी लगाविला.
विजयनगर अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण दि. २ एप्रिलला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपने विरोध केला असून या कार्यक्रमाच्या अगोदरच स्मारकाचे लोकार्पण करण्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे. यावर बोलताना विष्णू माने म्हणाले, महापालिकेत सन २००८ रोजी विकास महाआघाडीची सत्ता आली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी धनगर समाजाला न्याय देण्यासाठी प्रा.नितीन सावगावे यांची महापौरपदी निवड केली.
त्यावेळी सर्व समाजातील घटकांनी एकत्रित येऊन विजयनगर येथे अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी देऊन तातडीने निधीची तरतूद केली. तत्कालिन विधापरिषदेतील राष्ट्रवादीचे आमदार प्रभाकर घार्गे यांनी देखील दहा लाखांचा निधी त्यावेळी दिला. या कामाचा सतत पाठपुरावा केल्यानंतर हे काम आता मार्गी लागले आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी केवळ विकासाचे स्वप्न न दाखविता हे काम सत्यात उतरवले आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आज पूर्ण झाले. याचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार यांच्या हस्ते व्हावा, अशी इच्छा अनेक धनगर समाज बांधवांनी व्यक्त केली. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजे दि. 2 एप्रिलला खा.शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
मात्र या स्मारकाच्या कामाचे ज्यांचे देणे-घेणे नाही, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर समाजामध्ये असंतोष पसरविण्याचे काम करत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर स्मारकाचे काम सुरू झाल्यापासून एकवेळ देखील या ठिकाणी फिरकले नाही. मागील पाच वर्षात भाजपची सत्ता असताना देखील त्यांनी स्मारकासाठी दमडीचाही निधी दिला नाही. किंवा निधी गोळा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नाही. आता स्वत: लोकार्पण करण्याची भाषा बोलत आहे. बिरोबाच्या बनात खोटी शप्पथ घेऊन त्यांनी समाज बांधवांनी फसवणूक केली, आता किमान अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा त्यांनी प्रयत्न करू नयेत. जिल्ह्यात धनगर समाज बांधव एक आहेत. ते आता आ.पडळकर यांच्या पाठीशी उभे नाहीत. हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे केवळ स्मारकाच्या कामाला विरोध म्हणून भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान रचत असल्याचा आरोप विष्णू माने यांनी केला.