प्रतिनिधी/ खानापूर
सध्या आपला भारत देश कोरोना व्हायरसच्या महामारीच्या संकटात सापडला आहे. अशावेळी समाजामधील अनेक दुर्बल घटक आर्थिक संकटात सापडले असून त्यांना उपासमारीचे जीणे जगावे लागत आहेत. कर्नाटक सरकारने त्यामधील काही दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. पण त्यामध्ये कुंभार, सुतार, लोहार, शिंपी, लहान शेतकरी आदी दुर्बल घटकांना वगळण्यात आले आहे. त्यांच्यावर हा एकप्रकारे अन्याय असून या दुर्बल घटकांनाही राज्य शासनाने आर्थिक सहाय्य मंजूर करावे, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांना पाठविण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले. म. ए. समितीचे तालुका अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांच्याकडून उपतहसीलदार कोलकार यांनी निवेदनाचा स्विकार केला व ते मुख्यमंत्र्यांना पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी दुर्बल घटकासाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये कुंभार, लोहार, सुतार, शिंपी तसेच मिरची फळ-फळावर व भाजीपाला उत्पादक शेतकऱयांचा समावेश केलेला नाही. लॉकडाऊनमुळे मोठय़ा बजारपेठाही बंद आहेत. अशावेळी कुंभार, सुतार, लोहार यांनी तयार केलेल्या मालाला तसेच शेतकऱयांनी उत्पादीत केलेला मिरची भाजीपाला, फळ-फळावर यांची विक्री होऊ शकत नाही. यामुळे त्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे. अशावेळी राज्य शासनाच्या आर्थिक पॅकेजमध्ये यासर्व घटकांचाही समावेश करणे अत्यंत गरजेचे असून या मागणीचा मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने विचार करून या सर्व घटकांनाही दिलासा द्यावा, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
निवेदन करताना आणासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, यशवंत बिरजे, महादेव घाडी, शिवाजी पाटील, कृष्णा मन्नोळकर, तातोबा पाटील, श्रीकांत दामले, रमेश देसाई, भैरु पाटील, विवेक गिरी, बाळासाहेब शेलार, शामराव पाटील, रमेश पाटील, प्रवीण पाटील, मोहन पाटील यासह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते.