ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या काळात जिल्हा, राज्य आणि केंद्रस्तरावर सगळ््यांनी एकत्रित काम केले, त्यामुळे खूप लवकर या संकटातून बाहेर पडू शकलो. सगळ्या व्यवस्था रात्रंदिवस या काळात काम करीत होत्या. परंतु सामाजिक संस्थामुळे या काळात निर्माण झालेला ताण कमी झाला. समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून जेव्हा आपण काम करतो, तेव्हा आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत, तिथे चांगले कार्य घडते, असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
सोशल रिस्पॉन्सिबीलीटी आणि महा एनजीओ फेडरेशनतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार, विवेकानंद पुरस्कार आणि जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस अधिकारी प्रेमा पाटील, रमेश अगरवाल, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, सोशल रिस्पॉसिबीलिटीचे अध्यक्ष विजय वरूडकर, पुरस्कार समिती प्रमुख सुनील जोशी आदी उपस्थित होते.
जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.अभिजीत सोनवणे, दिनकर कांबळे, नवनाथ जगताप यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात करण्यात आला. विवेकानंद पुरस्काराने मयूर बागुल, उमाकांत मीटकर, दामोदर रामदासी, विनायक रायकर, प्रल्हाद कुटे, आनंदा थोरात, अविनाश गोफणे या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. तर, जिजाऊ पुरस्काराने चंद्रकला भार्गव, अनिता झांबरे, मीना भोसले, नलिनी शेरकुरे, पुष्पलता डोके, हर्षाली चौधरी, यती राऊत यांना सन्मानित करण्यात आले.
कृष्ण प्रकाश म्हणले, छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी घडविले. शिवाजी महाराजांना जिजाऊंनी अवघड परिस्थितीत त्यांना घडविले, त्यामुळे शिवाजी महाराज जाणते राजे झाले आणि त्यांंनी स्वराज्याची स्थापना केली. दुर्बलतेचा परित्याग करा, आपल्या देशाला मजबूत मन आणि मजबूत देहाची गरज आहे. या दोन गोष्टी लहानपणापासून डोक्यात होत्या आणि हे स्वामी विवेकानंदांनी शिकविले, पोलिस अधिकारी म्हणून काम करताना या शिकवणींचा उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले.