ऑनलाईन टीम / पुणे :
रक्तदान हे केवळ आपले कर्तव्य नसून ही समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्यातर्फे स्वेच्छा रक्तदान चळवळ प्रेरणा गीताचा लोकार्पण सोहळा 26 जानेवारी रोजी विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मोहन चासकर, जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, कोविड काळात आपल्याला रक्ताची किंमत कळाली. या काळात रक्ताची जी तूट निर्माण झाली ती आता भरून काढण्याची गरज आहे. यासाठी रक्तदान करणे आवश्यक असून या काळात जे आपल्या देशासाठी अविरत काम करत राहिले असे सैनिक, डॉक्टर, शेतकरी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम आहे असे मला वाटते.
याप्रसंगी राजेश पांडे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, विद्यार्थी हे संवेदनशील असतात. समाजाप्रती त्यांची संवेदनशीलता वाढविणे हे काम विद्यापीठाकडून होतं. अशा प्रकारचा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांवर संस्कार आहे.
हे प्रेरणा गीत महेंद्र वाघ यांनी लिहिले आहे. जितेंद्र अभ्यंकर यांनी ते गायले व जीवन धर्माधिकारी यांनी या गीताला संगीत दिले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशुतोष काळे यांनी केले