प्रतिनिधी / नागठाणे :
समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे काळाची गरज असून, कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी अंध्दश्रध्देला बळी न पडता सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आणि लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे, असे उद्गार अंनिसचे प्रमुख व सातारचे मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.हमीद दाभोळकर यांनी काढले.
नागठाणे (ता.सातारा) येथील आर्टस ॲन्डकॉमर्स महाविद्यालयातील विवेक वाहिनी समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कोरोना आणि अंध्दश्रध्दा’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
ते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अंध्दश्रध्देचे पेव फुटले असून, अज्ञान, अंध्दश्रध्दा आणि समज-गैरसमज इत्यादीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अंध्दश्रध्देतून मुक्त व्हायचे असेल तर शास्रीय ज्ञानावर विश्वास ठेवण्याची अवश्यकता आहे. तसेच प्रसारमाध्यमे जेवढी चांगली आहेत. तितकीच घातक असून, अफवांचा जलद गतीने प्रसार करतात. त्यामुळे त्याचा समाजजीवनावर विपरीत परिणाम होतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरचे सामाजिक शास्र विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जे.एस.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी यासंदर्भात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ॲानलाईन सहभाग नोंदविला.